खरिपाच्या नुकसानीचे तातडीने सर्व्हेक्षण करा

- आ.भावना गवळी
वाशिम जिल्हा प्रतिनिधी
अजय गायकवाड
मालेगाव :- तालुक्यातील मुंगळा, कळंबेश्वर, मेडशीसह जिल्ह्यातील इतरत्र परिसरात पडलेल्या ढगफुटी सदृश्य पावसाने खरिपाच्या पिकाच्या मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीचे सर्व्हेक्षण तातडीने करावे असे निर्देश आ.भावना गवळी यांनी प्रशासनाला दिले आहेत.
दीर्घ विश्रांती नंतर वाशिम जिल्ह्यात पुन्हा पावसाने सुरुवात केली आहे. या परतीच्या पावसाने सोयाबीन सोंगनीच्या हंगामात आलेल्या खरिपाच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शनिवारी रात्री दरम्यान मालेगाव तालुक्यातील मुंगळा, कळंबेश्वर, मेडशीसह मालेगाव तालुक्यात व जिल्ह्यातील इतरत्र परिसरात पडलेल्या ढगफुटी सदृश्य पावसाने खरिपाच्या पिकाच्या मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मोर्णा नदी पात्रालगतच्या अनेक शेत जमिनी खरडून गेल्याने शेतजमिनीचे सुध्दा नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्त भागाची पाहणी आ.भावना गवळी यांनी केली. यावेळी त्यांनी ढगफुटी सदृश्य पावसाने व नदी नाल्याच्या पाण्याने नुकसान झालेल्या सर्व शेत जमिनीचे सर्व्हेक्षण करण्याच्या सूचना महसूल व कृषी विभागाला दिल्या आहेत.
यावेळी त्यांच्या सोबत नायब तहसिलदार सुरज सागर, शिवसेनेचे प्रदीप पाटील कुटे, मंगेश महाराज, विलास जाधव, प्रदीप पाटील मोरे, मंडळ अधिकारी, तलाठी यांच्यासह आदींची उपस्थिती होती.
चौकट
नुकसान झालेल्या सर्व शेतीचे सर्व्हेक्षण करा – आ. गवळी
पावसाच्या पाण्याचे मोजमाप करण्यासाठी पर्जन्यमान मोजणी यंत्र ठिकठिकाणी लावण्यात आले आहे. मात्र या मधील काही यंत्र नादुरुस्त आहेत त्यामुळे पडलेल्या पावसाची योग्य नोंद घेतल्या जात नाही. पर्जन्यमान यंत्रावर अवलंबून न राहता नुकसान झालेल्या सर्व शेतीचे व पिकाचे सर्व्हेक्षण करण्यार यावे, अशा सूचना आ.भावना गवळी पाटील यांनी महसूल व कृषी विभागाला दिल्या आहेत.



