75 फूट ध्वज स्तंभावर दिमाखात फडकला तिरंगा…

स्टार भारत लाईव्ह एकसप्रेस
चिखली तालुका: प्रतिनिधी
अरुणा दत्तात्रय खंडागळे
आ. श्वेता महाले पाटील यांच्या हस्ते छत्रपती श्री शिवाजी महाराज उद्यानात ध्वजारोहण; तिरंगा रॅलीतून राष्ट्रभक्तीचा जागर
भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त चिखली शहरात राष्ट्राभिमान आणि देशभक्तीचा उत्साह ओसंडून वाहताना दिसला. छत्रपती श्री शिवाजी महाराज उद्यान येथे ७५ फूट उंच ध्वजस्तंभावर तिरंग्याचे ध्वजारोहण आमदार सौ. श्वेताताई महाले पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. आकाशात अभिमानाने डौलाने फडकणाऱ्या राष्ट्रध्वजाला मानवंदना देत स्वातंत्र्यदिनाचा गौरवपूर्ण उत्सव जल्लोषात साजरा करण्यात आला.
स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने सकाळी राजा टॉवर येथे वीर पत्नी वृषाली हरिदास कापसे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. येथून छत्रपती श्री शिवाजी महाराज उद्यानापर्यंत भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली. हातात तिरंगा घेऊन सहभागी झालेल्या नागरिक, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’ अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून टाकला. तिरंग्याच्या रंगांनी सजलेली ही रॅली चिखलीकरांच्या राष्ट्रप्रेमाचे दर्शन घडवणारी ठरली.
छत्रपती श्री शिवाजी महाराज उद्यानात ७५ फूट उंच तिरंगा फडकताच उपस्थितांनी राष्ट्रगीताच्या सन्मानाने आणि भारतमातेच्या जयघोषाने वातावरण भारावून टाकले. यावेळी देशाच्या स्वातंत्र्यासाठी संघर्ष करणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांचे तसेच देशाच्या सीमेचे रक्षण करत सर्वोच्च बलिदान देणाऱ्या वीर जवानांच्या त्यागाचे कृतज्ञतापूर्वक स्मरण करण्यात आले.
विशेषतः शहीद जवान स्व. हरिदास कापसे यांच्या वीरपत्नी श्रीमती वृषालीताई कापसे यांच्या उपस्थितीने कार्यक्रमाला भावनिक आणि राष्ट्रभक्तीपूर्ण अधोरेखित मिळाले. देशासाठी प्राण अर्पण करणाऱ्या वीरांच्या कुटुंबीयांप्रती कृतज्ञता व्यक्त करत त्यांच्या त्यागाला मानवंदना देण्यात आली.
यावेळी विविध शासकीय योजनांच्या लाभार्थ्यांना लाभांचे वितरण करण्यात आले. शासनाच्या कल्याणकारी योजनांचा लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी अधिक प्रभावीपणे कार्य करण्याचा संकल्प यानिमित्ताने दृढ करण्यात आला.
आमदार श्वेताताई महाले पाटील यांच्या पुढाकारातून साकारलेल्या या ७५ फूट उंच तिरंग्यामुळे चिखलीच्या वैभवात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला असून, तिरंगा रॅली, वीरांच्या बलिदानाचे स्मरण, उंच ध्वजस्तंभावरील ध्वजारोहण आणि लोककल्याणाचा संकल्प यामुळे यंदाचा स्वातंत्र्यदिन चिखलीकरांसाठी विशेष आणि अविस्मरणीय ठरला.



