नाशिकमध्ये ‘स्वराज्य’ची महत्त्वाची बैठक संपन्न,शेतकरी प्रश्नांवर सज्ज होण्याचे संभाजीराजे छत्रपतींचे आवाहन….!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
प्रतिनिधी:- मुकिंदा गव्हांदे जळगाव जामोद
नाशिक २० मार्च २०२६
येथील कालिका माता मंदिर सभागृहात १९ मार्च रोजी स्वराज्य संघटनेची अत्यंत महत्त्वाची बैठक संभाजीराजे छत्रपती यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत उत्तर महाराष्ट्रातील पक्षसंघटनेचा आढावा घेण्यात आला असून, आगामी काळात शेतकरी आणि कष्टकऱ्यांच्या प्रश्नांवर आक्रमक पवित्रा घेण्याचे संकेत संभाजीराजेंनी दिले आहेत.या बैठकीला स्वराज्य संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रशांत डिक्कर यांच्यासह प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीत प्रत्येक पदाधिकाऱ्याने आपल्या कार्यक्षेत्रातील कामाचा आढावा सादर केला. संभाजीराजे यांनी तब्बल दोन तास कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधला. यावेळी कार्यकर्त्यांनी स्थानिक समस्या मांडल्या, तर राजेंनी संघटनात्मक बांधणीसाठी मोलाचे मार्गदर्शन केले. कार्यकर्त्यांना संबोधित करताना संभाजीराजे छत्रपती म्हणाले की, “राज्यातील शेतकरी आणि शेतमजुरांच्या प्रश्नांबाबत राज्य आणि केंद्रसरकार गंभीर नसल्याचे चित्र आहे. आता वेळ आली आहे . महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या पाठीशी कार्यकर्त्यांनी पूर्ण ताकदीनिशी सज्ज व्हावे. प्रत्येक गावात आणि घराघरात ‘स्वराज्य’ पोहोचवून सामान्यांची ताकद उभी करा.”या बैठकीमुळे नाशिक जिल्ह्यातील स्वराज्य संघटनेच्या कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह संचारला असून, आगामी काळात संभाजीराजे छत्रपती यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक जिल्ह्यात संघटनेच्या कार्यकर्त्यांची मोठी फळी निर्माण करण्यासाठी राज्यभरात कार्यकर्त्यांच्या बैठका,मेळावे आयोजित करणार असल्याचे प्रशांत डिक्कर यांनी बैठकीत बोलताना सांगितले. या बैठकिला जिल्ह्यातील स्वराज्याचे पदाधिकारी, महिला पदाधिकारी व कार्यकर्ते व बहुसंख्य युवकांची उपस्थिती होती….



