बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

हरिदास कापसेंना भावपुर्ण मानवंदना….

स्टार भारत लाईव्ह एकसप्रेस
चिखली तालुका: प्रतिनिधी
अरुणा दत्तात्रय खंडागळे

शहीद हरिदास कापसेंच्या स्मृती जपणार; शेलसूरमध्ये स्मारक उभारणार – आ.श्वेता महाले पाटील .

भारतमातेच्या सेवेसाठी आपल्या प्राणांचे सर्वोच्च बलिदान देणारे शहीद जवान स्व. हरिदास कापसे यांच्या अस्थिकलश शोकसभेस चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार श्वेता महाले पाटील यांनी उपस्थित राहून शहीद जवानाच्या पवित्र स्मृतींना अभिवादन केले. अस्थिकलशाचे पूजन करून त्यांनी वीर जवानाला मानवंदना दिली तसेच कापसे परिवाराच्या दुःखात सहभागी होत शोकभावना व्यक्त केल्या.

यावेळी बोलताना आमदार श्वेता महाले पाटील म्हणाल्या, “हरिदास कापसे यांनी देशाच्या रक्षणासाठी आपल्या आयुष्याचा विचार न करता भारतमातेच्या चरणी आपल्या प्राणांची आहुती दिली. देशाच्या सीमेवर उभा असलेला प्रत्येक जवान आपल्या कुटुंबापासून दूर राहून देशातील कोट्यवधी नागरिकांचे संरक्षण करत असतो. अशा वीर जवानाचे तरुण वयात जाणे ही संपूर्ण समाजासाठी अत्यंत वेदनादायी बाब आहे.”

“एका बाजूला देशासाठी सर्वोच्च बलिदान देणारा वीर जवान आणि दुसऱ्या बाजूला त्यांच्या पश्चात राहिलेली पत्नी आणि लहान मुले… या कुटुंबाच्या दुःखाची कल्पनाही करणे कठीण आहे. पतीचे छत्र हरपल्याचे दुःख, वडिलांच्या प्रेमापासून वंचित झालेल्या चिमुकल्यांची पोकळी आणि संपूर्ण आयुष्याची जबाबदारी एकट्याने पेलणाऱ्या पत्नीचे दुःख शब्दांत व्यक्त करता येणार नाही. मात्र, कापसे परिवाराने हे दुःख एकट्याने पेलावे लागणार नाही. संपूर्ण समाज आणि प्रशासन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील,” अशी ग्वाही त्यांनी दिली.

त्या पुढे म्हणाल्या, “हरिदास कापसे यांचे बलिदान पुढील पिढ्यांना प्रेरणा देत राहावे, त्यांच्या शौर्याची आणि देशभक्तीची आठवण सदैव जिवंत राहावी, यासाठी शेलसूर येथे शहीद हरिदास कापसे यांचे स्मारक उभारण्यात येईल. या स्मारकातून देशासाठी बलिदान देणाऱ्या वीर जवानाला कायमस्वरूपी आदरांजली अर्पण केली जाईल.”

“देशाच्या सीमांचे रक्षण करणाऱ्या सैनिकांमुळे आपण आपल्या घरात सुरक्षितपणे जगतो. त्यामुळे जवानांच्या त्यागाची जाणीव ठेवणे आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी उभे राहणे ही आपली सामाजिक जबाबदारी आहे. शहीद हरिदास कापसे यांचे बलिदान संपूर्ण देश सदैव स्मरणात ठेवेल,” असेही आमदार श्वेता महाले पाटील यांनी सांगितले.

यावेळी वीरपिता मधुकर शंकर कापसे, कर्नल सुहास जतकर, प्रा. डॉ. सदानंद देशमुख,अमोल साठे,अंकुशराव वाघ माजी बांधकाम सभापती जिल्हा परिषद, अरविंद बापू देशमुख माजी सभापती पंचायत समिती, रवींद्र काळे, सरपंच विजय धंदर, मेजर सुभेदार रामदास धंदर, अजिंक्य पाटील, राजेंद्र काळे, राजेंद्र रिंढे पोलिस पाटील, गजानन इंगळे माजी पंचायत समिती सदस्य, ज्ञानेश्वर कापसे, सुनील सपकाळ बुलढाणा, शेख सुभान मुख्याध्यापक, पत्रकार श्याम देशमुख, विशाल नेमाने, लक्ष्मण रिंढे, विजय घ्याळ यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते….

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button