आमदार मनोज कायदे यांनी घेतली केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट; सिंदखेडराजा मतदारसंघातील रस्ते व महामार्गाच्या कामांसाठी निधी देण्याचे गडकरींचे सकारात्मक संकेत

सिंदखेड राजा मतदारसंघातील रस्ते व पुलांच्या विकासकामांसाठी निधी देण्याबाबत ना. गडकरींची सकारात्मक भूमिका
स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
प्रतिनिधी – शंकर शिवरकर
देऊळगावराजा:जालना-पुलगाव राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाला गती द्या,आमदार मनोज कायंदे यांची केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे मागणी मातृतीर्थ सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी पायाभूत सुविधांचा दर्जा उंचावणे अत्यंत आवश्यक असून, मतदारसंघातील प्रलंबित विकासकामांना गती मिळण्यासाठी सिंदखेड राजा मतदारसंघाचे आमदार मनोज नंदाताई देवानंद कायंदे यांनी नवी दिल्ली येथे केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री मा. ना. नितीनजी गडकरी साहेब यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान मतदारसंघातील विविध प्रलंबित प्रश्न आणि महत्त्वपूर्ण विकासकामांचे निवेदन त्यांना सादर करण्यात आले.
या महत्त्वपूर्ण बैठकीत आमदार मनोज कायंदे यांनी
प्रामुख्याने जालना-पुलगाव राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाला तातडीने गती देण्यात यावी,
अशी आग्रही मागणी केली. हा महामार्ग परिसरातील दळणवळणाच्या आणि आर्थिक विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा दुवा ठरणार आहे. यासोबतच सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण व शहरी भागाला जोडणाऱ्या विविध प्रमुख रस्ते आणि पुलांच्या नवीन विकासकामांना तातडीने मंजुरी देण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी निवेदनाद्वारे केली.
भेटीदरम्यान मातृतीर्थ सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासंदर्भातील विविध विषयांवर दोन्ही नेत्यांमध्ये सविस्तर आणि सकारात्मक चर्चा झाली. मतदारसंघातील रस्ते, पूल आणि इतर पायाभूत सुविधांचा दर्जा जागतिक दर्जाचा करण्यासाठी आवश्यक असलेल्या विविध विकासकामांचा पाठपुरावा यापुढेही दिल्ली आणि मुंबई पातळीवर सातत्याने सुरू राहील, असा विश्वास आमदार मनोज कायंदे यांनी यावेळी व्यक्त केला.
आमदार कायंदे यांनी मांडलेल्या मागण्यांचा गांभीर्याने विचार करून, केंद्रीय मंत्री मा. नितीनजी गडकरी साहेब यांनी सिंदखेड राजा मतदारसंघातील रस्ते व पुलांच्या विकासकामांसाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून भरीव निधी उपलब्ध करून देण्याबाबत अत्यंत सकारात्मक भूमिका दर्शवली. यामुळे मतदारसंघातील दळणवळणाच्या अनेक वर्षांपासूनच्या प्रलंबित समस्या सुटण्यास मोठी मदत होणार आहे.



