जळगाव जामोद येथे भारतीय बौद्ध महासभेची जिल्हा बैठक; धम्मप्रबोधन व समाजप्रबोधनाच्या उपक्रमांना मिळणार दिशा…..!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
प्रतिनिधी:- मुकिंदा गव्हांदे जळगाव जामोद
जळगाव जामोद- १७ जुलै २०२६
वर्षावास, ग्रामशाखा सक्षमीकरण, सदस्य नोंदणी, धम्मप्रबोधन व समता सैनिक दलाच्या उपक्रमांवर होणार सविस्तर चर्चा भारतीय बौद्ध महासभा, बुलढाणा (उत्तर) जिल्हा शाखेची महत्त्वपूर्ण जिल्हा बैठक शनिवार, दि. १८ जुलै २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता जळगाव जामोद येथील पंचशील बुद्धविहार येथे आयोजित करण्यात आली आहे. भारतीय बौद्ध महासभा, तालुका शाखा संग्रामपूरच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीत जिल्ह्यातील तसेच तालुक्यातील सर्व पदाधिकारी, बौद्धाचार्य, केंद्रीय शिक्षक, समता सैनिक दलाचे अधिकारी आणि धम्मकार्याशी बांधिलकी असलेल्या समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यावर्षीच्या आषाढ पौर्णिमा व वर्षावास निमित्त राबविण्यात येणाऱ्या विविध धार्मिक व सामाजिक उपक्रमांचे नियोजन या बैठकीत करण्यात येणार आहे. वर्षावास प्रवचन मालिका, धम्मप्रबोधन कार्यक्रम, ग्रामशाखा सक्षमीकरण, सदस्य नोंदणी अभियान, विविध धम्मशिबिरे तसेच समता सैनिक दलाच्या संघटनात्मक उपक्रमांचा सविस्तर आढावा घेऊन पुढील दिशा निश्चित केली जाणार आहे. त्यामुळे ही बैठक संघटनात्मक दृष्टीने अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. बैठकीचे अध्यक्षस्थान जिल्हाध्यक्ष एस. एस. वळे भूषविणार असून, राज्य संघटक तथा जिल्हा प्रभारी भीमराव तायडे यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभणार आहे. संघटना अधिक सक्षम करण्यासाठी आणि धम्मकार्य गावागावात प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी सर्व पदाधिकाऱ्यांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
बैठकीत ‘मिशन २०२५’ अंतर्गत प्रत्येक गावात ग्रामशाखा स्थापन करणे, सदस्य नोंदणी मोहीम गतीमान करणे, वर्षावास प्रवचन मालिका राबविणे, तालुका कार्यकारिणीचा अहवाल सादर करणे, विविध शिबिरांचे आयोजन, समता सैनिक दलाच्या साप्ताहिक परेड व अधिवेशनाचे नियोजन अशा महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होणार आहे. संघटन मजबुती, धम्मकार्याचा विस्तार आणि समाजप्रबोधनाचा संकल्प अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी ही बैठक दिशादर्शक ठरेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे….




