श्रीराम नागरी पतसंस्था ते बैल जोडी चौक रस्त्याचे काम तातडीने सुरू करा; अन्यथा मनसेचा तीव्र आंदोलनाचा इशारा

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
चिखली तालुका प्रतिनिधी
अरुणा दत्तात्रय खंडागळे
चिखली
शहरातील अत्यंत महत्त्वाच्या आणि नेहमी वर्दळ असलेल्या श्रीराम नागरी सहकारी पतसंस्था ते बैल जोडी चौक (‘जुना सिमेंट रोड’) या रस्त्याचे रेंगाळलेले काम येत्या ३ ते ४ दिवसांत प्रत्यक्ष सुरू न झाल्यास स्थानिक नागरिकांना सोबत घेऊन ‘मनसे स्टाईल’ने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने नगर परिषद प्रशासनाला देण्यात आला आहे. यासंदर्भात मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी नगर परिषदेचे मुख्याधिकारी साहेबांना सोमवारी रीतसर निवेदन सादर केले.
सादर केलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, श्रीराम नागरी पतसंस्था ते बैल जोडी चौक हा परिसरातील मुख्य रस्ता असून यावरून दररोज शेकडो नागरिक, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक व वाहनधारक ये-जा करतात. गत काही दिवसांपूर्वीच या रस्त्या च्या कामाचे भूमीपूजन मोठ्या उत्साहात पार पडले होते. मात्र, भूमीपूजन होऊन अनेक दिवस उलटूनही प्रत्यक्ष कामाला अद्याप सुरुवात झालेली नाही.
सध्या या रस्त्याची अत्यंत बिकट अवस्था झाली असून संपूर्ण रस्त्यावर ठिकठिकाणी भयंकर खड्डे पडले आहेत. खड्ड्यांमुळे वाहनधारकांना नाहक कसरत करावी लागत असून दररोज लहान-मोठे अपघात घडत आहेत. रात्रीच्या वेळी खड्ड्यांचा अंदाज न आल्यामुळे गंभीर जीवितहानी किंवा कायमचे अपंगत्व येण्याची भीती निर्माण झाली आहे. तसेच धूळ आणि खड्ड्यांमुळे परिसरातील नागरिक व व्यापाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. “केवळ दाखवण्यासाठी भूमीपूजन झाले होते की नागरिकांना चांगला रस्ता मिळणार आहे?” असा संतप्त सवाल आता सामान्य जनतेकडून विचारला जात असून प्रशासनाच्या या धिम्या कारभाराबाबत तीव्र असंतोष पसरला आहे.
त्यामुळे प्रशासनाने या निवेदनाची गांभीर्याने दखल घेऊन येत्या ३ ते ४ दिवसांत काम प्रत्यक्ष सुरू करावे.
अन्यथा होणाऱ्या सर्व प्रशासनीय तसेच कायदा व सुव्यवस्थेच्या कोंडीस नगर परिषद प्रशासनच जबाबदार राहील, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. या निवेदनाची प्रत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनाही पाठवण्यात आली आहे.
त्यावेळी चिखली शहर अध्यक्ष नारायण बापू देशमुख, शहर सचिव अजय खरपास, विभाग प्रमुख बंटी कळमकर, तेजराव इंगळे उपस्थित होते.✍️



