स्मृती वृक्षारोपणातून माणसांना वृक्षरूपी जिवंत ठेवता येईल!

कै.अंजनाबाई आहेर यांच्या स्मृतिनिमित्त ९० वटवृक्षांचे रोपण..
स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
प्रतिनिधी – शंकर शिवरकर
देऊळगाव राजा : आपल्या प्रिय व्यक्तीच्या स्मृती चिरंतन ठेवण्याचा पर्यावरणपूरक मार्ग म्हणून प्रा.डॉ.अरुण वामनराव आहेर यांनी धरती बचाओ मिशन परिवाराच्या माध्यमातून आपल्या मातोश्री कै.अंजनाबाई आहेर यांच्या स्मृतिनिमित्त ९० वृक्ष लावण्याचा उपक्रम हाती घेतला आहे.कै. अंजनाबाई आहेर यांचे वयाच्या ९० व्या वर्षी निधन झाले.त्यांच्या स्मृतीनिमित्त देऊळगाव राजा येथील महादेवाच्या खोऱ्यात राष्ट्रीय वृक्ष वटवृक्षासह २५ वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले असून, उर्वरित ६५ वृक्षांचेही पुढील काळात वृक्षारोपण करण्यात येणार आहे.
या उपक्रमासाठी पर्यावरणप्रेमी वनश्री जनाबापू मेहेत्रे यांनी पुढाकार घेत वृक्ष उपलब्ध करून देत जागेची निश्चिती करून वृक्षारोपणाचे नियोजन केले.
यावेळी सेवानिवृत्त वनपरिक्षेत्र अधिकारी जे.एस.डोईफोडे, आर.एफ.ओ.उमेश गायकवाड,
वनश्री जनाबापू मेहेत्रे,प्रा.डॉ. अरुण आहेर,वृक्षप्रेमी भुजंगराव शिराळकर,वृक्ष मित्र रामेश्वर शेवाळे,राहुल सुरुशे,वैभव लाखोले,कु.क्रांती मेरत,उमेश गिराम आदी उपस्थित होते.
यावेळी वनश्री जनाबापू मेहेत्रे म्हणाले, “स्मृतीशेष व्यक्तींच्या आठवणी केवळ छायाचित्रांत न ठेवता वृक्षरूपी जिवंत ठेवता येतात.राष्ट्रीय सण उत्सव, वाढदिवस,थोरा मोठ्यांची जयंती पुण्यतिथी,लग्नाचा वाढदिवस किंवा प्रिय व्यक्तींच्या स्मृतिनिमित्त वृक्ष लावून त्याचे संगोपन करावे.‘जगावे परी वृक्षरुपी जगावे, उरावे परी वृक्षरूपी उरावे’ हा विचार समाजाने स्वीकारण्याची गरज आहे.पर्यावरणाचा ढासळलेला समतोल आणि वाढते ग्लोबल वॉर्मिंग लक्षात घेता प्रत्येकाने अशा पर्यावरणपूरक उपक्रमात सहभागी व्हावे.”
९० वर्षांच्या स्मृतींना ९० वृक्षांची हिरवी मानवंदना देणारा हा उपक्रम पर्यावरण संवर्धनासोबतच समाजाला स्मृती जपण्याचा नवा आदर्श देणारा ठरत आहे.



