वर्षावासनिमित्त हिंगणा गावात ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ ग्रंथ वाचनाला भारतीय बौद्ध महासभेचे संस्कार सचिव मिलिंद वानखेडे व जिल्हा संघटक तथा तालुका प्रभारी भाऊराव गव्हांदे यांची भेट……!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
प्रतिनिधी:- मुकिंदा गव्हांदे जळगाव जामोद
संग्रामपूर:- २६ ऑगस्ट २०२६
वर्षावासाच्या पार्श्वभूमीवर हिंगणा गावात मुकिंदा गव्हांदे यांच्या निवासस्थानी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ या महत्त्वपूर्ण ग्रंथाचे नियमित वाचन, मनन, पठण व चिंतन केले जात आहे. या उपक्रमातून भगवान गौतम बुद्धांचे विचार, धम्माचे तत्त्वज्ञान आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलेला बौद्ध धम्म समाजापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला जात आहे. या ग्रंथाचे वाचन कु. पायल मुकिंदा गव्हांदे व सम्यक दिनेश उमाळे करीत असून, हिंगणा गावातील नमो बुद्धाय मित्र मंडळ तसेच सुजाता महिला मंडळाच्या सदस्यांसह बौद्ध बांधव मोठ्या संख्येने एकत्र येऊन ग्रंथाचे वाचन व श्रवण करीत आहेत. वर्षावासाच्या काळात धम्मविचारांचा अभ्यास करण्यासाठी सुरू असलेल्या या उपक्रमाला गावकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
दरम्यान, आज भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा संस्कार सचिव मिलिंद वानखेडे तसेच जिल्हा संघटक तथा तालुका प्रभारी भाऊराव गव्हांदे यांनी हिंगणा येथे भेट देऊन सुरू असलेल्या ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ ग्रंथ वाचन उपक्रमाची पाहणी केली. यावेळी त्यांनी उपस्थित धम्मप्रेमींशी संवाद साधत आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी मार्गदर्शन करताना त्यांनी भगवान बुद्धांना केवळ पूज्य व्यक्ती म्हणून न पाहता त्यांच्या विचारांना, शिकवणीला आणि धम्माच्या तत्त्वज्ञानाला समजून घेणे आवश्यक आहे, असे सांगितले. बुद्धांनी दिलेला मानवतावाद, समता, करुणा, प्रज्ञा, मैत्री आणि विवेकाचा मार्ग जीवनात आचरणात आणण्याचे आवाहनही त्यांनी केले. ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ या ग्रंथाच्या माध्यमातून बुद्धांचे जीवन, त्यांचे विचार आणि धम्माची भूमिका समजून घेण्यास मदत होते. त्यामुळे वर्षावासाच्या काळात अशा प्रकारे सामूहिक वाचन, मनन आणि चिंतनाचे आयोजन केल्याने नव्या पिढीलाही धम्मविचारांची ओळख होण्यास मदत होत आहे. या उपक्रमामुळे हिंगणा गावात धम्मवाचनासोबतच सामाजिक समता, बंधुता आणि मानवतेचा संदेश पोहोचत असून, वर्षावास काळातील हा उपक्रम बौद्ध समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहे. उपस्थितांनी नियमितपणे ग्रंथाचे वाचन, श्रवण व चिंतन करून बुद्धांचा धम्म आचरणात आणण्याचा संकल्प व्यक्त केला.



