भारतीय संविधान स्विकृतीचा वर्धापन दिन कशासाठी?

दि.२६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान सभेने भारतीय संविधान स्वीकृत करून स्वतः प्रत म्हणजेच राष्ट्राच्या प्रती अर्पण केलं. दि. २६ जानेवारी १९५० पासून त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू झाली. त्यामुळे २६ जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन तर २६ नोव्हेंबर हा संविधान दिन म्हणून नावारूपाला आला. त्याच्या महतीवर प्रकाश टाकणार हा लेखाजोखा.
(ज्याप्रमाने महापुरुषांच्या जयंती किंवा स्मृितिदिन)
भारतीय समाज दरवर्षी महापुरुषांच्या जयंत्या व स्मृतिदिन मोठ्या प्रमाणात व उत्साहात साजरा करत असतो, तो कशासाठी? तर त्यांच्या विचारांना उजाळा मिळणे एवढाच उद्देश त्यामागे नसतो , तर त्यांच्या विचारांप्रमाणे आपण व इतरांनीही आचरण करावे हा खरा उद्देश असतो. तसेच महापुरुषांनी अपेक्षिलेल्या विचारांची म्हणजेच समता, स्वातंत्र्य, न्याय, बंधुत्व या महान मानवी मूल्यांवर आधारित समतावादी समाज व्यवस्था निर्माण झाली की नाही? हे तपासणे. त्यांच्या विचारतील समाज व्यवस्था निर्माण झाली नसेल , तर ती का झाली नाही? झाली असेल तर किती प्रमाणात झाली? ती पूर्णपणे का झाली नाही? महापुरुषांच्या विचारतील समाज व्यवस्था निर्माण करण्याची जबाबदारी कोणावर होती? ज्यांच्यावर ती जबाबदारी होती ती त्यांनी व्यवस्थित पार पाडली की नाही? ती त्यांनी व्यवस्थित पार पाडली असेल, तर ही समतावादी समाज व्यवस्था निर्माण न होण्याची कारणमीमांसा काय आहे? काय मनुवादी अडसर बलवान झाले आहेत? काय आजच्या बहुजन समाजाची नाडी मनुवाद्यांच्या हातामध्ये आहे? काय बहुजन समाज भ्रमित आणि भयभित झाला आहे? झालाच असेल तर मनुवाद्यांनी कोणती रणनिती वापरली? बहुजन समाजाचे विविध अंगांनी शोषण करणारे आजचे मनुवादी, हे महापुरुषांना त्रास देणारे,त्यांना मारेकरी पाठवणारे, त्यांच्या विचारधारेमध्ये मिलावट किंवा घुसखोरी करणारे, त्यांना रक्ताच्या श्याहीची पत्र पाठवणारे, वेळप्रसंगी त्यांचा खूनही करणारे, ही त्यांची पिलावळ तर नाही? असे असेल तर महापुरुषांच्याच विचारधारेचा त्यांच्या विरोधात रणनिती म्हणून वापर व इतिहासाचे विश्लेषण करून, त्यापासून धडा घेऊन आजचा बहुजन समाज भ्रम, भय तथा भटमुक्त कसा होईल. आपली कमजोर नाडी त्यांच्या हातामधून कशी अलगद काढून घेईल. महापुरुषांवर विविध प्रकारे वज्रप्रहार करणाऱ्या मनुवादी पिलावळी पासून तो स्वतःला कसा वाचविल? महापुरुषांच्या स्वप्नातील मानवी मूल्यांवर आधारित समतावादी समाज व्यवस्था कशी निर्माण करता येईल? यासाठी प्रेरणा व आदर्श घेण्यासाठी समाजाने महापुरुषांच्या जयंत्या किंवा स्मृतिदिन साजरे केले पाहिजेत.
( त्याप्रमाणे संविधान दिवस )
९ डिसेंबर १९४६ ला अस्तित्वात आलेली संविधान सभा जीचे कामकाज २ वर्षे ११ महिने १७ दिवस चालले. या कालावधी मध्ये संविधान सभेची ११ सत्रे भरली. त्या ११ सत्रांचे कामकाज प्रत्येक्षात १६५ दिवसच चालले. संविधान सभेने मसुदा समितीची निवड २९ ऑगष्ट १९४७ ला केली. नियुक्त मसुदा समितीची पहिली बैठक ३० ऑगष्ट १९४७ ला झाली. त्यांना प्रत्यक्ष १४१ दिवसच कामकाजासाठी मिळाले. आणि शेवटी ३९५ कलम व ८ परिशिष्ट असलेले संविधान २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान सभेने स्वीकृत केले. म्हणूनच २६ नोव्हेंबर हा दिवस सर्व भारतीयांनी संविधान दिवस म्हणून पहापुरूषांच्या जयंती स्मृितीदिना प्रमाणे साजरा केला पाहिजे. कारण २५ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान सभेसमोर शेवटचे भाषण करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय समाजाला एक गर्भित इशारा दिला होता, तो असा की, “संविधान कितीही चांगले असले तरी, ते राबविण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे ते जर अप्रामाणिक असतील तर ते वाईट ठरल्या शिवाय राहणार नाही. तसेच संविधान कितीही वाईट असो ते राबवण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे, ते जर प्रामाणिक असतील तर ते चांगले ठरल्या शिवाय राहणार नाही” त्यांच्या या गर्भित इशाऱ्याप्रमाणे शहानिशा करण्यासाठी ऐतिहासिक दस्तऐवज तपासले असता,२ नोव्हेंबर १९४८ ते ९ नोव्हेंबर १९४८ या दरम्यान भरलेल्या संविधान सभेच्या सत्रामध्ये संविधान समितीच्या अनेक सभासदांनी संविधानाचा तथा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा केलेला गौरव पाहता संविधान हे उत्कृष्ट असल्याचे सिद्ध होते. त्यामध्ये आवर्जून काही सन्माननीय सभासदांचा उल्लेख करावा लागेल, तो म्हणजे संविधान सभेचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र प्रसाद , संविधान सभेच्या सल्लागार समितीचे अध्यक्ष सरदार वल्लभभाई पटेल, मसूदा समिती वरील एका सदस्य व्यक्तीच्या मृत्यु नंतर ज्यांची निवड झाली ते डॉ. टी.टी. कृष्णमाचारी, वरिष्ठ सदस्य पंडित ठाकुर्दास भार्गव यांच्या सोबत आणखीही अनेक सदस्यांनी एवढा गौरव केला की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आपल्या शेवटच्या भाषण प्रसंगी म्हणाले की आता मला संविधान किती चांगले आहे हे सांगण्याची आवश्यकताच नाही.
प्रश्न आता उरतो, की संविधानाला राबवणारे हात प्रामाणिक आहेत, की अप्रामाणिक? त्यासाठी आम्हाला २६ जानेवारी १९५० ते आजपर्यंतचा जवळपास ७२ वर्षांचा कालावधी प्रामाणिक, तटस्थ व निष्पक्ष भूमिकेतून डोळ्याखालून घालावा लागेल . त्यामध्ये आम्हाला हे पाहावे लागेल की, संविधानाने स्वीकारलेली मानवी मूल्य समता, स्वातंत्र्य, न्याय, बंधुत्व यावर आधारित समतावादी समाज व्यवस्था निर्माण झाली की नाही? १३ डिसेंबर १९४६ ला पंडित जवाहलाल नेहरू यांनी मांडलेल्या ध्येय उद्दिष्टांच्या ठरवामध्ये असे म्हटले होते की, अनु. जाती, अनु. जमाती, इतर मागास प्रवर्ग तसेच अल्पसंख्यांक समाजातील लोकांना त्यांचे संवैधनिक हक्क अधिकार दिले जातीलच. संविधानानुसार दहा वर्षांच्या आत ६ ते१४ वर्ष गटातील सर्वांना सक्तीचे व मोफत शिक्षण देणे भाग होते. २६ जानेवारी १९५० रोजी संविधानाच्या माध्येमातून देशाने राजकिय लोकशाही स्वीकारली नंतर आम्हाला आर्थिक व सामाजिक लोकशाही स्वीकारुन ती रुजवायची होती. लोकसंख्या नियंत्रण करण्यासाठी कठोर व कणखर पावले उचलणे परिस्थितीला साजेसे ठरले असते. उपलब्ध लोकसंख्या मानवी बळात किंवा संसाधनात (human resources)वर्गिकृत करणे, जातीयवाद, धर्मवाद, अस्पृष्यता, भाषावाद, प्रांतवाद यांनाही मूठमाती द्यायची होती. लिंग भेद मिटवून स्त्री-पुरुष समानता प्रस्थापित करायची होती. देशामध्ये उपलब्ध साधन संपत्तीचे समान वाटप करणे गरजेचे होते. ज्ञानार्जनाची दारे सर्वांसाठी खुली करून कौशल्याधिष्टीत शिक्षण प्रणालीला प्राधान्य द्यायचे होते. शिक्षणाच्या माध्यमातून वैचारिक प्रगल्भता वाढवून धर्म चिकित्सा करून जे-जे म्हणून चांगले ते-ते स्वीकारार्य आहे अशी भावना निर्माण व्हावी यासाठी प्रयत्न करणे पूर्वीही अपेक्षित होतं आणि आजही आहे.
वरील सर्व प्रश्नांची विश्लेषणात्मक चर्चा करून उत्तर मिळविण्याचे प्रयत्न केले असता , उत्तरं नकारार्थी येण्याचीच दाट शक्यता नाकारता येत नाही. म्हणजेच ज्यांच्या हाती सत्तेच्या चाव्या पूर्वी होत्या आणि आज ज्यांच्याकडे आहेत त्यांना या संविधान दिनी जाणिव करून देणे आवश्यक आहे. फक्त जाणिव करून देऊनच भागणार नाही तर त्यांना संविधानाची अंमलबजावणी करण्यास भाग पाडले पाहिजे. जर तसे होत नसेल तर त्याच संविधानातील तरतुदींचा वापर करून संविधान न राबविणाऱ्या हातांना वेठबिगारीच्या कामावर राबण्यासाठी मुक्त केले पाहिजे. असे ज्या दिवशी होईल, तो खरा संविधान दिवस असेल. तीच खरी राष्ट्रभक्ती असेल. तेच खरे राष्ट्रप्रेम असेल. तीच घटनाकाराला खरी आदरांजली असेल.
भिमराव परघरमोल
व्याख्याता तथा अभ्यासक
फुले शाहू आंबेडकरी विचारधारा
तेल्हारा जि.अकोला
मो.९६०४०५६१०४



