अंतुर्ली येथे केळी पिकांच्या नुकसानीची रक्षाताई खडसे यांच्याकडून पाहणी

मुक्ताईनगर, प्रतिनिधी : तालुक्यातील अंतुर्ली परिसरात गेल्या काही दिवसांपासून झालेल्या मान्सूनपूर्व पाऊस, गारपीट आणि वादळी वाऱ्यामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांनी आज अंतुर्ली येथे भेट देऊन केळी पिकांच्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी केली.
यावेळी स्थानिक भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नुकसानग्रस्त शेतकरी उपस्थित होते. शेतकऱ्यांशी संवाद साधत खडसे यांनी पिकांच्या नुकसानीची माहिती जाणून घेतली व संबंधित यंत्रणांना तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या.
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना योग्य मदत मिळावी यासाठी विमा कंपनी तसेच कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना पंचनामे करण्याबाबत यापूर्वीच सूचना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. तसेच ज्या शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे, त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधून नुकसानीची माहिती तात्काळ नोंदवावी, असे आवाहनही त्यांनी केले.
मान्सूनपूर्व अवकाळी पावसामुळे केळीसह विविध पिकांचे मोठे नुकसान झाल्याने शेतकरी चिंतेत असून, शासनाने तातडीने मदत द्यावी अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.



