संग्रामपूर येथे ‘नल जल मित्र’ प्रशिक्षण कार्यक्रमाची परीक्षा संपन्न….!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
प्रतिनिधी:- मुकिंदा गव्हांदे जळगाव जामोद
संग्रामपूर:- २९ एप्रिल २०२६
संग्रामपूर तालुक्यात जल जीवन मिशन अंतर्गत राज्य पाणी व स्वच्छता मिशन (SWSM), पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग, महाराष्ट्र शासन तसेच महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी, मुंबई (MSSDS) यांच्या संयुक्त विद्यमाने ‘नल जल मित्र’ प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या प्रशिक्षण कार्यक्रमाला युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून ग्रामीण भागातील पाणीपुरवठा व्यवस्थेला अधिक सक्षम करण्याचा यामागील मुख्य उद्देश आहे.
या प्रशिक्षणात मल्टीस्किल (RPL मॉडेल) अंतर्गत प्री-स्क्रीनिंग, प्रत्यक्ष प्रशिक्षण व मूल्यांकन या तीन टप्प्यांमध्ये उमेदवारांना मार्गदर्शन करण्यात येत आहे. नल जल मित्र म्हणून कार्य करणाऱ्या युवकांना पाणीपुरवठा योजना, नळजोडणी दुरुस्ती, गळती नियंत्रण, मोटार पंप देखभाल, स्वच्छता व्यवस्थापन तसेच ग्रामपातळीवरील जलस्रोतांचे संरक्षण याबाबत सविस्तर माहिती देण्यात येत आहे. आज संग्रामपूर येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये या प्रशिक्षण कार्यक्रमाची परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेसाठी मोठ्या संख्येने प्रशिक्षणार्थी उपस्थित होते. परीक्षेद्वारे उमेदवारांच्या तांत्रिक ज्ञानाचे व कौशल्याचे मूल्यमापन करण्यात आले. ही परीक्षा संकेत ढोले सर व श्रीकांत ढोले सर यांनी घेतली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली परीक्षा शिस्तबद्ध व सुरळीत पार पडली. प्रशिक्षणादरम्यान तज्ज्ञ मार्गदर्शकांकडून प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांसह तांत्रिक माहिती देण्यात आल्याने सहभागी युवकांमध्ये आत्मविश्वास वाढला आहे.भविष्यात गावपातळीवर उद्भवणाऱ्या पाणीपुरवठा समस्यांचे तात्काळ निराकरण स्थानिक पातळीवरच होण्यासाठी हे प्रशिक्षण अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. जल जीवन मिशनचा उद्देश ‘हर घर जल’ ही संकल्पना प्रभावीपणे राबविणे असून प्रत्येक घरापर्यंत सुरक्षित व स्वच्छ पिण्याचे पाणी पोहोचविण्यासाठी प्रशिक्षित मनुष्यबळ तयार करणे ही काळाची गरज आहे. या पार्श्वभूमीवर ‘नल जल मित्र’ प्रशिक्षण कार्यक्रम ग्रामीण युवकांसाठी रोजगाराची संधी निर्माण करणारा ठरत असून स्थानिक प्रशासन व संबंधित विभागाच्या सहकार्याने हा उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात येत आहे.



