श्रीक्षेत्र कोथळी येथे अखंड हरिनाम सप्ताहाची पूर्णाहुती व सांगता सोहळा संपन्न; स्वामीनारायण मंदिरातील पवित्र प्रसादाची भेट आणि संतांच्या उपस्थितीत सोहळ्याची भव्य सांगता

राज्याचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे (नाथाभाऊ) यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त (अमृत महोत्सव) श्रीक्षेत्र कोथळी येथील पावन श्री संत मुक्ताई जुने मंदिर परिसरात गेल्या सात दिवसांपासून सुरू असलेल्या ऐतिहासिक ‘अमृत महोत्सव अखंड हरिनाम सप्ताह, संगीत श्री संत मुक्ताई चरित्र तथा संगीत श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळ्याचा’ आज मंगळवार, दिनांक १ सप्टेंबर २०२६ रोजी अत्यंत उत्साहात, भक्तिभावात आणि मंगलमय वातावरणात सातवा व अंतिम दिवस पार पडला.
सांगता सत्रातील ऐतिहासिक प्रसंग व लक्ष्मी मातेची साडी प्रसाद भेट :
या महासोहळ्याच्या सांगता सत्राचा अत्यंत महत्त्वपूर्ण आणि भावूक क्षण म्हणजे, स्वामीनारायण संप्रदायाच्या श्रीक्षेत्र वडताल (गुजरात) या प्रमुख स्थळावरून श्री लक्ष्मी मातेला अर्पण केली जाणारी पवित्र साडी प्रसादाच्या रूपाने श्रीक्षेत्र कोथळी येथे आणण्यात आली होती. पी.पी. स्वामी यांनी आणलेली ही विशेष साडी सतपंथ आचार्य प.पू. महामंडलेश्वर गुरुवर्य जनार्दन हरीजी महाराज यांच्या पवित्र हस्ते केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांना अत्यंत आदराने सुपूर्द करण्यात आली. या दुर्मिळ आणि मंगल प्रसंगाने उपस्थित भाविकांचे मन भरून आले.
संत-महात्मे व महाराज गणांची प्रमुख उपस्थिती :
सप्ताहाच्या या पूर्णाहुती सोहळ्याला राज्यभरातून आलेल्या अनेक नामवंत संत-महात्मे आणि महाराज मंडळींचे दिव्य सानिध्य लाभले. यामध्ये सतपंथ आचार्य प.पू. महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांच्या प्रमुख उपस्थिती व मार्गदर्शनाखाली संपूर्ण सोहळा पार पडला. तसेच याप्रसंगी ह.भ.प. कन्हैया महाराज, सुखदेव महाराज, श्री संत मुक्ताई चरित्रकार ह.भ.प. श्री. विशालजी महाराज खोले, श्रीमद् भागवत कथा वाचक ह.भ.प. श्री. खगेन्द्रजी महाराज (शहादेकर), आणि पाल (ता. रावेर) येथील प्रवचनकार संत श्री गोपाल चैतन्यजी महाराज यांच्यासह अनेक दिग्गज वारकरी व संतश्रेष्ठांची विशेष उपस्थिती होती.
संत मुक्ताई चरित्राचा संपूर्ण प्रवास व सांगता :
गेल्या सात दिवसांपासून सुरू असलेल्या या ज्ञानयज्ञाच्या अखेरच्या दिवशी श्री संत मुक्ताई चरित्रकार ह.भ.प. विशालजी महाराज खोले यांनी आपल्या सुश्राव्य व ओघवत्या वाणीतून आदिशक्ती मुक्ताई आणि वारकरी संप्रदायाच्या संपूर्ण जीवनप्रवासाचा सुंदर आढावा घेतला. प्रारंभीपासूनच्या विठ्ठल पंतांचा जन्म, तीर्थयात्रा, विवाह, संन्यास ते थेट मुक्ताईच्या अंतर्धान समाधीपर्यंतच्या सर्व ऐतिहासिक व आध्यात्मिक प्रसंगांवर त्यांनी विस्तृत प्रकाश टाकला. श्रोत्यांनी गेल्या सात दिवसांत झालेली ही कथा अतिशय तन्मयतेने ऐकली.
पसायदानासह महासोहळ्याची गोड सांगता :
कथेच्या अंतिम चरणात उपस्थित सर्व संतांच्या व मान्यवरांच्या हस्ते आमदार एकनाथराव खडसे (नाथाभाऊ) यांच्या दीर्घायुष्यासाठी आणि जनहितासाठी विशेष अभीष्टचिंतन करण्यात आले. त्यानंतर सामूहिक पसायदानाचे भावपूर्ण पठण करण्यात येऊन या भव्य आणि ऐतिहासिक अमृतमहोत्सव सोहळ्याची मंगलमय वातावरणात सांगता झाली. या सात दिवसांच्या महोत्सवाचा लाभ घेण्यासाठी जळगाव जिल्ह्यासह राज्यभरातून लाखो भाविक, वारकरी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून महाप्रसादाचा लाभ घेतला.






