श्रीक्षेत्र कोथळीत अखंड हरिनाम सप्ताहाचा सहावा दिवस संपन्न; गुरु-शिष्य परंपरेच्या वचनांनी आणि सुमधुर कथारसाने उजळला कोथळी परिसर

राज्याचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे (नाथाभाऊ) यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त (अमृत महोत्सव) श्रीक्षेत्र कोथळी येथील पावन श्री संत मुक्ताई जुने मंदिर परिसरात सुरू असलेल्या ‘अमृत महोत्सव अखंड हरिनाम सप्ताह, संगीत श्री संत मुक्ताई चरित्र तथा संगीत श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळ्याचा’ आज सोमवार, दिनांक ३१ ऑगस्ट २०२६ रोजी सहावा दिवस अत्यंत भक्तीमय आणि उत्साही वातावरणात पार पडला.
या महोत्सवात सतपंथ आचार्य प.पू. महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांच्या पवित्र व नित्य सानिध्यात आणि मार्गदर्शनाखाली सर्व धार्मिक कार्यक्रम अतिशय सुयोग्य पद्धतीने पार पडत आहेत. सप्ताहाच्या आजच्या सहाव्या दिवशी श्री संत मुक्ताई चरित्रकार ह.भ.प. श्री. विशालजी महाराज खोले यांच्या सुश्राव्य वाणीतून श्री संत मुक्ताई चरित्राचे अत्यंत मर्मभेदी व प्रबोधनपर कथन करण्यात आले. यावेळी महाराजांनी गुरु-शिष्य परंपरेचे महत्त्व स्पष्ट करताना, “शिष्य जर आपले नाव पुढे करत असेल, तर गुरुला त्याचा खरा स्वाभिमान वाटला पाहिजे; ‘मी याला सर्वकाही दिल्यावर हा माझ्याही पुढे जाईल’ ही संकोचित भावना गुरुच्या मनात कधीच नसते, तर शिष्याची प्रगती हीच गुरुची खरी गुरुदक्षिणा असते,” असा मोलाचा अध्यात्मिक संदेश दिला. तसेच वारकरी संप्रदायातील उच्च विचार आणि संत मुक्ताईच्या जीवनकार्यातील विविध पैलूंवर त्यांनी उपस्थितांसमोर सुंदर प्रकाश टाकला.
या ज्ञानयज्ञ सोहळ्यात इतर सत्रांमध्येही नामवंत महाराजांच्या वाणीतून कथा व प्रवचनांचा अमृतवर्षाव सुरू आहे. ज्यामध्ये श्रीमद् भागवत कथा वाचक ह.भ.प. श्री. खगेन्द्रजी महाराज, शहादेकर यांच्या सुमधुर वाणीतून श्रीमद् भागवत कथेचे रसास्वादन भाविकांना मिळत आहे, तर पाल (ता. रावेर) येथील प्रवचनकार संत श्री गोपाल चैतन्यजी महाराज यांचे मार्गदर्शन लाभत आहे. या धार्मिक व आध्यात्मिक महोत्सवाचा लाभ घेण्यासाठी पंचक्रोशीतील भाविक, वारकरी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहत असून, संपूर्ण कोथळी परिसर पूर्णपणे भक्तीमय व वारकरीमय झाला आहे.



