कांदा उत्पादक शेतकरी संकटात, उत्पादन खर्चही निघेना; सरकारने एकरी ५० हजार मदतीची शेतकऱ्यांची मागणी….!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
प्रतिनिधी:- मुकिंदा गव्हांदे जळगाव जामोद
संग्रामपूर – यावर्षी निसर्गाची साथ मिळाली असली तरी बाजारपेठेतील कोसळलेल्या भावामुळे कांदा उत्पादक शेतकरी पूर्णपणे खचून गेला आहे. कांद्याला मिळणारा भाव अत्यंत तुटपुंजा असल्याने शेतकऱ्यांचा लागवडीचा खर्चही निघणे कठीण झाले असून, संग्रामपूर तालुक्यातील शेतकरी सध्या हवालदिल झाला आहे.
तालुक्यातील आकोली येथील युवा शेतकरी विशाल चोपडे यांनी आपली व्यथा मांडताना सांगितले की, “यावर्षी मी माझ्या दोन एकर शेतात मोठ्या आशेने कांद्याची लागवड केली होती. यासाठी मशागत, बियाणे, खते आणि मजुरी असा एकूण १ लाख ४० हजार रुपये खर्च झाला. मात्र, बाजारपेठेत कांदा विक्री केल्यानंतर हातात केवळ ८४ हजार रुपये आले आहेत.” म्हणजेच, दोन एकरात या शेतकऱ्याला सुमारे ५६ हजार रुपयांचा थेट फटका बसला आहे.
सर्वसाधारणपणे एक एकर कांदा लावण्यासाठी ६० ते ७० हजार रुपये खर्च येतो. मात्र, सध्याची बाजारस्थिती पाहता उत्पादन खर्चही भरून निघत नसल्याने शेतकऱ्यांसमोर बँक कर्ज आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा, असा गंभीर प्रश्न उभा ठाकला आहे.
सरकारने तातडीने मदत द्यावी.
“कांदा उत्पादक शेतकरी सध्या आर्थिक संकटाच्या गर्तेत सापडला आहे. सरकारने शेतकऱ्याला आधार देण्यासाठी एकरी ५० हजार रुपये अनुदान जाहीर करावे, तरच शेतकरी जगू शकेल. अन्यथा, शेतकऱ्यांसाठी येणारा काळ अत्यंत वाईट असेल,” अशी तिखट प्रतिक्रिया विशाल चोपडे यांनी दिली आहे. आता सरकार या गंभीर परिस्थितीची दखल घेऊन शेतकऱ्यांना दिलासा देणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे….



