मुक्ताईनगरात गॅस गोदामावर चोरट्यांचा डल्ला; ८४ हजारांचे सिलेंडर लंपास, पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह

मुक्ताईनगर : मुक्ताईनगर–मलकापूर मार्गावरील NH-753L रस्त्यालगत असलेल्या इंडियन गॅस गोदामातून अज्ञात चोरट्यांनी तब्बल ८४ हजार २०१ रुपये किमतीचे घरगुती व व्यावसायिक गॅस सिलेंडर लंपास केल्याची घटना समोर आली आहे. संवेदनशील आणि ज्वलनशील गॅस सिलेंडर मोठ्या प्रमाणावर चोरीला जाण्याच्या या घटनेमुळे गोदामांच्या सुरक्षेसोबतच मुक्ताईनगर पोलिसांच्या गस्त आणि प्रतिबंधात्मक यंत्रणेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
ही चोरी १७ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजेपासून १८ ऑगस्ट रोजी सकाळी ८ वाजेपर्यंतच्या कालावधीत घडल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी इंडियन गॅसचे मॅनेजर दीपक समाधान कवळे यांनी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
चोरट्यांनी १४.२ किलो वजनाचे २४ रिकामे घरगुती सिलेंडर, १० किलो वजनाचे ३ रिकामे सिलेंडर, १० किलो वजनाचे ३ भरलेले घरगुती सिलेंडर आणि ५ किलो वजनाचे ६ भरलेले व्यावसायिक सिलेंडर असा एकूण ८४ हजार २०१ रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला.
विशेष म्हणजे, गॅस गोदाम हे संवेदनशील ठिकाण असताना एवढ्या मोठ्या प्रमाणावर सिलेंडर चोरीला जाण्यापर्यंत पोलिसांची गस्त, परिसरातील निगराणी आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना नेमक्या कुठे होत्या? असा सवाल उपस्थित होत आहे. चोरीचा कालावधीही तब्बल १४ तासांचा असल्याने चोरट्यांनी एवढा मुद्देमाल नेला तरी पोलिसांच्या किंवा संबंधित यंत्रणेच्या लक्षात ही बाब का आली नाही, हा तपासाचा महत्त्वाचा मुद्दा ठरणार आहे.
या घटनेमुळे केवळ चोरीचा गुन्हा म्हणून नव्हे, तर ज्वलनशील गॅस सिलेंडरची बेकायदेशीर वाहतूक किंवा गैरवापर होण्याची शक्यता लक्षात घेऊन तपास करण्याची गरज आहे. चोरीला गेलेले सिलेंडर कुठे आणि कोणाच्या माध्यमातून नेण्यात आले, गोदामाच्या सुरक्षेत नेमकी कोणती त्रुटी राहिली आणि परिसरात पोलिसांची नियमित गस्त होती का, याचा तपास होणे आवश्यक आहे.
या प्रकरणी भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३३१(४) आणि ३०५(अ) अन्वये अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास मुक्ताईनगर पोलीस करीत आहेत.
मात्र, गुन्हा दाखल करून तपास सुरू करणे एवढ्यावरच प्रकरण थांबणार आहे की चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलिस प्रशासन ठोस प्रतिबंधात्मक पावले उचलणार आहे? असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित होत आहे. संवेदनशील ठिकाणांभोवती पोलिसांची गस्त वाढवून सीसीटीव्ही, रात्रीची निगराणी आणि संशयित हालचालींवर लक्ष ठेवण्याची आवश्यकता या घटनेने अधोरेखित केली आहे.



