हिंगणा गावात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी….!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
प्रतिनिधी:- मुकिंदा गव्हांदे जळगाव जामोद
संग्रामपूर:- २ ऑगस्ट २०२६
डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व लहुजी साळवे यांच्या प्रतिमांचे पूजन ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती.
हिंगणा गावात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात व सामाजिक ऐक्याच्या वातावरणात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि क्रांतिगुरू लहुजी साळवे यांच्या प्रतिमांचे पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलनाने करण्यात आली.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या संघर्षमय जीवनाचा, साहित्याचा आणि समाजप्रबोधनासाठी दिलेल्या अमूल्य योगदानाचा गौरवपूर्ण आढावा घेतला. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज आणि लहुजी साळवे यांच्या प्रेरणादायी विचारांचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
कार्यक्रमात उपस्थित ग्रामस्थांनी आपल्या मनोगतातून महापुरुषांच्या विचारांचे महत्त्व अधोरेखित केले. सामाजिक समता, बंधुता, शिक्षण आणि संघटन यांचा संदेश प्रत्येकाने आपल्या जीवनात आचरणात आणावा, असे मत अनेक वक्त्यांनी व्यक्त केले. संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण व शिस्तबद्ध वातावरणात पार पडला.
या कार्यक्रमाला ज्येष्ठ नागरिक म्हणून एकनाथ मोरखडे, मनोहर मोरखडे, प्रशांत बावस्कार, अविनाश मोरखडे, दीपक मोरखडे, शरद मोरखडे आणि सुरेश उमाळे यांची प्रमुख उपस्थिती होती. गावातील महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक तसेच विविध क्षेत्रातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्याने कार्यक्रमाला विशेष उत्साह लाभला.
कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन राहुल मोरखडे यांनी केले, तर उपस्थितांचे आभार उमेश कुमार अढाळे यांनी मानले. महापुरुषांच्या विचारांचे स्मरण करून समाजात एकता, समता आणि बंधुभावाची भावना दृढ करण्याचा संदेश या जयंती सोहळ्यातून देण्यात आला…..✍️



