धुळे जिल्ह्यातील शिरपूर शहरात अमली पदार्थांच्या तस्करीवर आमदार एकनाथराव खडसे यांचा प्रश्न; शासनाकडून गुन्ह्यांची सविस्तर माहिती

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी
राज्यात अमली पदार्थांच्या वाढत्या तस्करीच्या पार्श्वभूमीवर, आमदार एकनाथराव खडसे यांनी शिरपूर (जिल्हा धुळे) येथील अमली पदार्थ तस्करीच्या घटनेबाबत अधिवेशनात प्रश्न उपस्थित केला होता. याप्रकरणी प्रशासनाकडून देण्यात आलेल्या माहितीत, एप्रिल २०२६ मध्ये शिरपूर शहरातील ‘शहादा फाटा’ परिसरातील हॉटेल जय भद्रा टी पॉईंट येथे एका व्यक्तीच्या ताब्यात २०.८४ ग्रॅम वजनाचे सुमारे ४,१६,७०० रुपये किमतीचे ‘एमडी’ (मेफेड्रोन) सदृश्य अमली पदार्थ मिळून आले होते. या प्रकरणी शिरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, या गुन्ह्यात एकूण ६ आरोपींविरुद्ध ४ जून २०२६ रोजी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे.
यावर उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले की, राज्यातील अमली पदार्थांच्या व्यापाराला आळा घालण्यासाठी ३१ ऑगस्ट २०२३ रोजी ‘अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स’ची (ANTF) स्थापना करण्यात आली आहे. केवळ २०२५ मध्ये टास्क फोर्स आणि पोलीस घटकांमार्फत ५२३.१७ कोटी रुपये किमतीचे अमली पदार्थ नष्ट करण्यात आले आहेत. याव्यतिरिक्त, जानेवारी २०२६ ते एप्रिल २०२६ या कालावधीत अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी राज्यात एकूण ११४२ गुन्हे दाखल करून १६२६ आरोपींना अटक करण्यात आली आहे आणि सुमारे २५४.५३ कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. राज्य शासन केंद्राच्या ‘अ होल-ऑफ-गव्हर्नमेंट अप्रोच’ (A Whole-of-Government Approach) या धोरणानुसार अमली पदार्थांची लागवड, उत्पादन आणि वाहतुकीवर प्रतिबंध घालण्यासाठी विविध विभागांच्या समन्वयातून विशेष मोहीम राबवत असल्याचेही शासनाकडून नमूद करण्यात आले आहे.



