
जळगाव जिल्ह्यातील हजारो शेतकरी अद्याप ‘प्रधानमंत्री किसान सन्मान निधी’ योजनेच्या लाभापासून वंचित असल्याची माहिती विधान परिषदेत समोर आली आहे. ई-केवायसी आणि आधार सीडिंगची प्रक्रिया पूर्ण न झाल्यामुळे जिल्ह्यातील ८०७६ शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळत नसल्याबाबतचा प्रश्न आमदार एकनाथराव खडसे यांनी सभागृहात उपस्थित केला होता. यावर उत्तर देताना राज्य सरकारने या तांत्रिक त्रुटी दूर करण्यासाठी क्षेत्रीय स्तरावर विशेष मोहीम राबवत असल्याचे स्पष्ट केले आहे.
आमदार खडसे यांनी ऑगस्ट २०२५ मधील सर्वेक्षणाचा दाखला देत या शेतकऱ्यांच्या प्रलंबित लाभाबाबत सरकारला जाब विचारला होता. या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले की, जळगाव जिल्ह्यातून एकूण ५,५३,५५८ शेतकऱ्यांनी पोर्टलवर नोंदणी केली असून त्यापैकी ५,१५,३४२ पात्र शेतकऱ्यांना आतापर्यंत २१ हप्त्यांचे एकूण १७५५.७७ कोटी रुपये थेट बँक खात्यात जमा करण्यात आले आहेत.
ज्या शेतकऱ्यांचे ई-केवायसी प्रमाणीकरण आणि बँक खाते आधारशी संलग्न झालेले नाही, त्यांना या योजनेचा लाभ मिळण्यात अडचणी येत आहेत. या त्रुटींची पूर्तता करण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या सूचनांनुसार जिल्हा प्रशासनाने क्षेत्रीय कार्यालये आणि पोस्ट कार्यालयांना विशेष निर्देश दिले आहेत. तसेच गावपातळीवर वेळोवेळी जागरूकता मोहिमा राबवून उर्वरित शेतकऱ्यांचे ई-केवायसी पूर्ण करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याचे शासनातर्फे सांगण्यात आले.



