मुक्ताईनगरमध्ये अवैध धंद्यांना उधाण; पोलीस निरीक्षक आशिष अडसूळ यांच्याकडून अपेक्षित कारवाईचा अभाव

मुक्ताईनगर (प्रतिनिधी): शहरात नुकतेच नवे पोलीस निरीक्षक म्हणून आशिष अडसूळ यांनी पदभार स्वीकारला होता. सुज्ञ नागरिकांमध्ये आशा होती की त्यांच्या नेतृत्वात शहरातील वाढत्या अवैध धंद्यांना आळा बसेल. मात्र, प्रत्यक्षात चित्र उलटेच दिसत आहे.
मुक्ताईनगर शहरामधील अवैध धंद्यांना सध्या नवसंजीवनी मिळाल्यासारखी स्थिती निर्माण झाली आहे. विशेषतः शहराच्या मध्यवर्ती भागातील परिवर्तन चौक, जेथे पोलीस प्रशासन नियमितपणे रूटमार्क करत असते, तिथेच खुलेआम अवैध सत्ता मटक्या च्या टपऱ्या यामध्ये व्यवसाय चालू आहेत. मद्यविक्री, जुगार अड्डे, तंबाखूजन्य गुटखा पदार्थांची विक्री आणि इतर अनधिकृत व्यवहार जोमाने सुरू असूनसुद्धा पोलीस यंत्रणेची कारवाई शून्य आहे.
सर्वसामान्य नागरिक व व्यापाऱ्यांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे. काहींचा सवाल आहे की, “पोलीस प्रशासन बघ्याची भूमिका घेते आहे का? की मग हे सारे मांजराच्या दूध पिण्यासारखे चालले आहे?”
शहरात वाढत्या असुरक्षिततेमुळे स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे वारंवार लेखी तक्रारी, सोशल मीडियावर पोस्ट्स आणि स्थानिक प्रतिनिधींमार्फत पाठपुरावा केला आहे. तरीदेखील कोणतीही ठोस कारवाई होताना दिसत नाही, ही बाब नक्कीच चिंतेची ठरते.
स्थानिक प्रशासन आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन मुक्ताईनगरमधील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी तातडीने कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.



