२० आरचा निकष नेमका कोणत्या आदेशावर? पूरग्रस्त शेतकऱ्यांचा प्रशासनाला सवाल; ३१ ऑगस्टपासून आंदोलनाचा इशारा…..!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
प्रतिनिधी:- मुकिंदा गव्हांदे जळगाव जामोद
जळगाव जामोद:- २३ ऑगस्ट २०२६
दि. ३१ जुलै रोजी आलेल्या महापुरामुळे शेती खरडून गेलेल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आता प्रशासनाकडून अधिकृत व लेखी खुलासा करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. याच मागणीसाठी पूरग्रस्त शेतकऱ्यांनी सोमवार, दि. २४ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता उपविभागीय अधिकारी कार्यालय, जळगाव जामोद येथे मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन शेतकरी आंदोलक प्रकाश विठ्ठलराव भिसे यांनी केले आहे.
पूरपरिस्थितीमुळे अनेक शेतकऱ्यांची शेती खरडून गेली असून, अशा नुकसानीच्या पंचनाम्यांमध्ये २० आरपेक्षा जास्त क्षेत्र खरडून गेल्यास ‘पोटखराब वर्ग (अ)’मध्ये समावेश केला जात असल्याचे, तर २० आरपेक्षा कमी क्षेत्रासाठी वेगळी प्रक्रिया केली जात असल्याचे शेतकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. काही शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष पंचनाम्यांमध्येही अशी बाब निदर्शनास आल्याचा दावा केला आहे. मात्र, २० आरचा हा निकष नेमका कोणत्या कायद्याच्या, शासन निर्णयाच्या, परिपत्रकाच्या किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशाच्या आधारे लागू करण्यात आला आहे? असा थेट सवाल आता शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे. प्रशासनाने याबाबत केवळ तोंडी माहिती न देता संबंधित नियमाचा अधिकृत आधार लेखी स्वरूपात स्पष्ट करावा, अशी मागणी करण्यात येणार आहे. यासंदर्भात दि. २४ ऑगस्ट रोजी उपविभागीय अधिकारी कार्यालयात निवेदन देऊन प्रशासनाकडून स्पष्ट कायदेशीर खुलासा मागण्यात येणार आहे. २० आरचा निकष लागू असल्यास त्याचा शासन आदेश अथवा अधिकृत दस्तऐवज शेतकऱ्यांसमोर ठेवावा, अशी प्रमुख मागणी करण्यात येणार आहे. दरम्यान, शेतकऱ्यांच्या या प्रश्नावर प्रशासनाने समाधानकारक व स्पष्ट लेखी खुलासा न केल्यास दि. ३१ ऑगस्ट २०२६ पासून आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे पूरग्रस्त शेतकऱ्यांनी आपल्या हक्काच्या प्रश्नासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या नुकसानीचे योग्य मूल्यमापन, पंचनाम्यांमध्ये पारदर्शकता आणि शासनाच्या मदतीसाठी पात्रता निश्चित करण्याची प्रक्रिया स्पष्ट असणे आवश्यक असल्याची भूमिका शेतकरी आंदोलक प्रकाश विठ्ठलराव भिसे यांनी मांडली आहे. त्यामुळे आता प्रशासन या २० आरच्या निकषाबाबत कोणता लेखी खुलासा करते, याकडे पूरग्रस्त शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे…….✍️



