बालपणीच्या मित्रांची तब्बल ३० वर्षानंतर पुन्हा भरली शाळा!, गुरुजींनी विद्यार्थ्यांना दिले आनंदी जीवनाचे कानमंत्र. एकत्र पाहून अनेकांच्या डोळ्यातून आनंदाश्रू अनावर!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस विजय घोडे तेल्हारा तालुका प्रतिनिधी:-
हिवरखेड | हिवरखेड शाळेतील विद्यार्थी तब्बल तीस वर्षानंतर त्याच विद्यार्थ्यांची अनोखी शाळा पुन्हा भरली आणि त्याच गुरुजींनी त्यांना आनंदी जीवनाचे अनमोल कानमंत्र दिले. आपल्या मित्रांना तीस वर्षानंतर पाहून अनेकांच्या डोळ्यातून आनंदाश्रू तरळले.
शाळेचे दिवस संपले की प्रत्येकजण आपल्या करियरसाठी वेगवेगळ्या क्षेत्राकडे धाव घेतो. मात्र ज्या शाळेत आपण शिकलो, घडलो, वेगवेगळ्या भागातील विद्यार्थ्यांबरोबर आपण मैत्रीचे नाते जोडले, ती नाळ मात्र तशीच असते. पुन्हा एकदा भेटावे, सर्वांसोबत हितगुज करावे असे सर्वांनाच वाटते. पण प्रत्येकजणच आपआपल्या नोकरी-धंद्यात, संसारात व्यस्त असल्यामुळे ते सहजासहजी शक्य होत नाही. मात्र अशक्यही नसते, ज्या शाळेत आपण घडलो, आयुष्य जगण्याचे तंत्र-मंत्र मिळाले, त्या शाळेतील पुन्हा एकदा त्याच विद्यार्थी मित्रांसोबत पुन्हा ३० वर्षानंतर भेटण्याची संधी चालून आली. ती म्हणजे या स्नेह मिलन सोहळ्यामुळे. १९९१ ते १९९६ च्या तुकडीतील मित्र क्लास फ्रेंड्स या नावाने व्हाट्स अँप ग्रुप मधून एकमेकांशी संपर्कात आले. अशातच सर्वांनी एकत्र येऊन कुठेतरी भेटून शाळेतील आठवणींना उजाळा द्यावा अशी इच्छा व्यक्त केली. त्याला सर्व मित्रांनी सकारात्मक प्रतिसाद देत हिवरखेड येथील निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या विघ्नहर्ता लॉन मध्ये भेटण्याची योजना आखून स्नेहमिलन सोहळा आयोजित करण्यात केला. अखेर तो दिवस उजळला. हळूहळू सर्व मित्र एकत्र गोळा झाल्यानंतर प्रत्येकाने आप आपली ओळख करून दिली. हिवरखेड येथील जिल्हा परिषद महात्मा गांधी विद्यालयातील ८० हुन अधिक विद्यार्थी, माजी वर्गमित्र इतक्या वर्षानंतरही पहिल्या भेटीत शाळेतील ते चेहरे आठवित होते. व हळुहळु सर्वांनी एकमेकांशी मनमुराद गप्पा करून नव्या-जुन्या आठवणींना उजाळा देत एकमेकांच्या परिवारा_ विषयी, कामकाजाविषयी व सध्या आपल्या आयुष्यात काय चालल आहे हे एकमेकांना सांगतांना गप्पा रंगत गेल्या.
१९९१ ते १९९६ ईयत्ता पाचवी पासून दहावी पर्यंत सोबत शिकलेल्या बॅचचे विद्यार्थ्यांनी आज आपल्या मित्रांकडे बघितले तर ३० वर्षानंतर ते चेहरे दिसले आणि जुन्या आठवणी जाग्या झाल्या. आयुष्यातले सर्व क्षण आठवणीत राहतात असे नाही, पण काही क्षण असे असतात की, जे विसरु म्हणताही विसरता येत नाही. आपण वयाने कितीही मोठे झालो किंवा आपापल्या क्षेत्रात कितीही यशस्वी झालो तरी शाळेचे ते सोनेरी दिवस आपण कधीच विसरू शकत नाही, पण वेळ कुणासाठी थांबत नाही आणि मागे पडलेले दिवस पुन्हा येत नाही. पण ह्या सर्व आठवणी अस्मरणीय असतात. बालपणातील मैत्री ही अवखळ, उनाड, परिपक्व नसली तरीही सतत हवीहवीशी वाटणारी असते. शाळेचे विश्व आणि मित्र हे एकमेकांशिवाय अधुरे आहेत.
या कार्यक्रमातील प्रत्येक क्षणाच्या गोड आठवणी जपत पुढच्या वर्षी पुन्हा स्नेह मिलन आयोजन करावे हे ठरले.
या कार्यक्रमाला त्याच तीस वर्षांपूर्वीच्या शाळेचे शिक्षक श्री गोमाशे सर आणि श्री अनिल गावंडे सर यांना सुद्धा निमंत्रित करण्यात आले होते. त्याच गुरुजींनी आपल्या जुन्या विद्यार्थ्यांची शाळा पुन्हा घेऊन आनंदी जीवन जगण्याचे लाख मोलाचे गुरु मंत्र दिले. यावेळी विद्यार्थ्यांकडून दोन्ही शिक्षकांचा यथोचित सत्कार करण्यात आला. एवढेच नव्हे तर या तीस वर्षाच्या कालखंडात ज्या शिक्षकांचे आणि वर्गातील मित्रांचे दुःखद निधन झाले त्या सर्वांना दोन मिनिटांचे मौन पाळून श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी जुन्या मित्रांच्या आणि शिक्षकांच्या आठवणींनी अनेकांचे डोळे पाणावले होते.
या स्नेहमिलन सोहळ्यात जुन्या आठवणींना उजाळा देत एकमेकांचे बालपण आठवण करीत शाळेतील गमतीशीर टिंगलटवाळी करीत, विविध खेळ खेळत, हसतमुख गाणी गात नृत्य करीत आनंदी प्रसन्नतेच्या वातावरणात हा स्नेहसंमेलन सोहळा संपन्न झाला. या स्नेह मिलन सोहळ्यात ३० वर्षापूर्वीचे जि प महात्मा गांधी विद्यालय हिवरखेड येथील विद्यार्थी महाराष्ट्राच्या काना कोपऱ्यातून मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सर्वांनी आपापल्या सुखदुःखाचे आदान प्रदान केले. काही मित्रांना तीस वर्षानंतर पाहून अनेकांच्या डोळ्यातून आनंदाश्रू तरळले. कार्यक्रमाचा शेवट उत्कृष्ट स्नेह भोजनाचा आस्वादाने करण्यात आला.



