बलिदानाला सलाम… तिरंग्याला मान! चिखलीत ७५ फूट उंचीवर फडकणार तिरंगाचिखली

बलिदानाला सलाम… तिरंग्याला मान! चिखलीत ७५ फूट उंचीवर फडकणार तिरंगा चिखली :
स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस | चिखली तालुका प्रतिनिधी – अरुणा दत्तात्रय खंडागळे
भारताच्या ७९व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त चिखली शहरात राष्ट्रप्रेम, शौर्य आणि शिस्तीचा संदेश देणारा भव्य सोहळा आयोजित करण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराज उद्यान येथे तब्बल ७५ फूट उंच ध्वजस्तंभावर राष्ट्रध्वज फडकविण्यात येणार असून, या सोहळ्यामुळे शहराच्या स्वातंत्र्यदिनाच्या उत्सवाला विशेष ऐतिहासिक स्वरूप प्राप्त होणार आहे.चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार श्वेता महाले पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित या कार्यक्रमात देशासाठी सर्वोच्च बलिदान देणारे शहीद जवान स्व. हरिदास कापसे यांच्या वीरपत्नी श्रीमती वृषालीताई हरिदास कापसे यांना विशेष मान देण्यात आला आहे. त्यांच्या हस्ते सकाळी ९ वाजता राजा टॉवर येथे ध्वजारोहण होणार आहे. शहीद जवानाच्या कुटुंबातील सदस्याच्या हस्ते राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्याचा हा उपक्रम त्यांच्या त्यागाप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा ठरणार आहे.यानंतर सकाळी ९.१५ वाजता राजा टॉवर येथून छत्रपती शिवाजी महाराज उद्यानापर्यंत भव्य तिरंगा रॅली काढण्यात येणार आहे. रॅलीदरम्यान वाहतूक व्यवस्था, नागरिकांची सुरक्षितता आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी संबंधित प्रशासनाच्या सूचनांचे पालन करणे आवश्यक राहणार आहे. मोठ्या संख्येने नागरिक सहभागी होण्याची शक्यता असल्याने शिस्तबद्ध पद्धतीने रॅली पार पाडण्याचे आवाहन करण्यात आले आहे.सकाळी १० वाजता छत्रपती शिवाजी महाराज उद्यान येथे आमदार श्वेता महाले पाटील यांच्या हस्ते ७५ फूट उंच ध्वजस्तंभावर तिरंगा ध्वजारोहण करण्यात येणार आहे. राष्ट्रध्वजाचा सन्मान, कार्यक्रमातील शिस्त आणि सार्वजनिक सुव्यवस्था यांना प्राधान्य देत हा सोहळा पार पाडला जाणार आहे.दरम्यान, सार्वजनिक कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी प्रशासन व पोलिसांच्या सूचनांचे पालन करावे, वाहतुकीस अडथळा निर्माण होईल अशा पद्धतीने वाहनांची गर्दी करू नये तसेच राष्ट्रध्वजाच्या सन्मानास बाधा येईल असे कोणतेही कृत्य टाळावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. देशभक्तीचा उत्साह कायम ठेवताना कायदा, सुव्यवस्था आणि सामाजिक सलोखा जपण्याची जबाबदारी प्रत्येक नागरिकाची असल्याचेही अधोरेखित करण्यात आले आहे.या कार्यक्रमाला नगराध्यक्ष पंडितदादा देशमुख, नगरपरिषद पदाधिकारी, आजी-माजी पदाधिकारी, नगरसेवक, बूथ प्रमुख, शक्तिकेंद्र प्रमुख, भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच देशप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.शहीद हरिदास कापसे यांच्या बलिदानाला अभिवादन करत त्यांच्या वीरपत्नीच्या हस्ते तिरंग्याला मानवंदना देण्याचा हा उपक्रम ‘वीरांच्या बलिदानाला सलाम आणि राष्ट्रध्वजाला मानाचा मुजरा’ असा संदेश देणारा ठरणार आहे. चिखली शहरात देशभक्तीचा उत्साह आणि सार्वजनिक शिस्त यांचा सुंदर संगम घडवून आणण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.







