जिल्हा बँकेच्या निवडणुकीत नवे नेतृत्व विरुद्ध प्रस्थापितांचा गड! कायंदेंच्या ‘परिवर्तन’ पॅनलने उभे केले आव्हान

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
प्रतिनिधी – शंकर शिवरकर
देऊळगाव राजा : तब्बल १६ वर्षांनंतर होत असलेल्या बुलढाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेच्या निवडणुकीने जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील राजकीय समीकरणे पुन्हा चर्चेत आणली आहेत. बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी विविध राजकीय पक्षांतील दिग्गज एकत्र आले असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला अपेक्षित प्रतिनिधित्व मिळाले नसल्याची भूमिका घेत सिंदखेडराजाचे आमदार मनोज कायंदे यांनी स्वतंत्र पॅनल उभे केले आहे. ‘स्व. अजितदादा पवार शेतकरी परिवर्तन पॅनल’च्या माध्यमातून निवडणुकीत उतरल्याने बिनविरोध निवडीच्या समीकरणाला वेगळे वळण मिळाले आहे.
जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सर्वपक्षीय पातळीवर प्रयत्न झाले. त्यातून २१ पैकी १२ संचालक बिनविरोध झाले असून, उर्वरित नऊ जागांसाठी २३ उमेदवार रिंगणात आहेत. माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्यासह विविध राजकीय प्रवाहांतील नेत्यांचा बिनविरोध निवड झालेल्या संचालकांमध्ये समावेश आहे.
मात्र, सर्वपक्षीय नेते एकत्र येण्याची वेळ नेमकी का आली आणि बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी एवढे व्यापक राजकीय समीकरण का उभे राहिले? हा प्रश्न आता चर्चेत आला आहे. सहकार क्षेत्रात पक्षीय राजकारणाला स्थान नसल्याचे सांगितले जात असताना विविध पक्षांचे नेते एकत्र आले; मात्र त्याच समीकरणात अजित पवार गटाला अपेक्षित प्रतिनिधित्व मिळाले नसल्याचा दावा कायंदे यांनी केला. त्यामुळे या सर्वपक्षीय समीकरणामागील राजकीय गणितावरही प्रश्न उपस्थित झाले आहेत.
कायंदे यांच्या भूमिकेनुसार, बिनविरोध निवडणूक ही त्यांचीही भूमिका होती; मात्र सर्व घटकांना समान प्रतिनिधित्व मिळाले तरच ती प्रक्रिया अर्थपूर्ण ठरते. सर्वांना सोबत घ्यायचे असेल, तर सर्वांना समान न्याय का नाही? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. जिल्हा बँक ही शेतकरी आणि सभासदांच्या हिताशी जोडलेली संस्था असल्याने निर्णयप्रक्रियेत विविध घटकांना योग्य प्रतिनिधित्व मिळणे आवश्यक असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
‘स्व. अजितदादा पवार शेतकरी परिवर्तन पॅनल’ या नावातून स्व. अजितदादा पवार यांच्या सहकार क्षेत्रातील योगदानाचा संदर्भ पुढे आणण्यात आला आहे. कायंदे यांच्या भूमिकेनुसार, स्व. अजितदादांचा खरा सन्मान करायचा असेल, तर त्यांच्या पक्षाला आणि कार्यकर्त्यांना जिल्हा बँकेच्या निवडणुकीत योग्य प्रतिनिधित्व मिळणे अपेक्षित होते. अजित पवार गटाला योग्य जागा देऊन या पॅनलचा सन्मान राखला असता, तर तीच स्व. अजितदादांना खरी श्रद्धांजली ठरली असती, असा संदेश त्यांच्या भूमिकेतून पुढे येत आहे.
या घडामोडींमुळे डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या सहकारातील नेतृत्वाचीही कसोटी लागली आहे. जिल्हा बँकेच्या राजकारणात दीर्घकाळ प्रभावी राहिलेल्या नेतृत्वासमोर आमदार मनोज कायंदे यांनी स्वतंत्र पॅनलच्या माध्यमातून आव्हान उभे केले आहे. त्यामुळे डॉ. शिंगणे यांच्या नेतृत्वाची पूर्वीची धार कायम आहे का, की सहकारातील समीकरणे बदलू लागली आहेत? हा प्रश्नही चर्चेत आला आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर अजित पवार गट आणि आमदार मनोज कायंदे हे डॉ. शिंगणे यांच्या नेतृत्वासमोरील प्रमुख राजकीय आव्हान म्हणून पुढे येत आहेत का? याचीही चर्चा सुरू झाली आहे. मात्र, या राजकीय दाव्यांची खरी कसोटी निवडणुकीच्या निकालातूनच लागणार आहे.
यापुढे आणखी एक प्रश्न महत्त्वाचा ठरणार आहे. निवडणुकीनंतर माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाची धुरा एखाद्या सामान्य कार्यकर्त्याच्या हाती सोपवून नवे नेतृत्व पुढे आणणार का? की प्रस्थापित नेतृत्वच पुन्हा सत्ताकेंद्रात राहणार? हा प्रश्नही या निवडणुकीच्या निमित्ताने पुढे आला आहे. त्यामुळे संचालक कोण होणार, यासोबतच पुढील अध्यक्षपदाची दिशा काय असेल, याकडेही सहकार क्षेत्राचे लक्ष लागले आहे.
कायंदे यांच्या भूमिकेमुळे ही निवडणूक आता केवळ नऊ जागांची लढत न राहता नवे नेतृत्व विरुद्ध प्रस्थापित नेतृत्व, प्रतिनिधित्व विरुद्ध जागावाटपाचे समीकरण आणि सामान्य शेतकरी-सभासदांच्या आवाजाचा प्रश्न अशा व्यापक मुद्द्यांभोवती फिरताना दिसत आहे.
उर्वरित नऊ जागांवरील निकालातून ‘परिवर्तन’ पॅनलला किती जनाधार मिळतो, प्रस्थापित नेतृत्वाची पकड किती कायम आहे आणि जिल्हा बँकेच्या भविष्यातील सत्तासमीकरणाची दिशा कोणती असेल, याचे संकेत मिळणार आहेत. त्यामुळे बिनविरोध निवडीचे समीकरण कुठे चुकले, अजित पवार गटाला अपेक्षित प्रतिनिधित्व का मिळाले नाही आणि कायंदेंचे आव्हान किती प्रभावी ठरते, याकडे आता जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.



