भारतीय म्हणून आपणास सार्थ अभिमान असला पाहिजे दीपध्वज कोसोदे

*प्रतिनिधी: सुरेश भाऊ भारतीय म्हणून आपणास सार्थ अभिमान असला पाहिजे दीपध्वज कोसोदे** रावेर येथील प्रवर्तन ग्लोबल फॉउंडेशन यांच्या वतीने संविधान दिना निमित्त जनजागृती व्हावी यासाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्या प्रसंगी प्रसिद्ध साहित्यिक दीपध्वज कोसोदे बोलत होते. आधुनिक अखंड भारताचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २६ नोव्हेंबर १९४९ रोजी आपल्या भारत देशाला संविधान अर्पण केले अन् २६ जानेवारी १९५० पासून, पूर्वीची पारंपरिक व्यवस्था संपुष्टात येऊन भारतात संविधानिक लोकसत्ताक कार्यप्रणाली अस्तित्त्वात आली. बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय व धर्मनिरपेक्षता या संविधानिक तत्वांवर देशाची एकता, अखंडता अन् राष्ट्रीय एकात्मता जोपासण्याचे महान, अनमोल कार्य केले, माणसाला माणूस म्हणून जगण्याचा सन्मानपूर्वक मुलभूत अधिकार दिला. त्या संविधानाबद्दल आपण खरचं कृतज्ञ आहोत का ? संविधानामुळे आपला भारत देश अखंड, सार्वभौम आहे याचा भारतीय म्हणून आपल्याला सार्थ अभिमान असायलाच पाहिजे. बाबासाहेबांनी ‘मी प्रथम भारतीय आहे, अन् अंततः ही भारतीय आहे’ अशी व्यापक राष्ट्रवादाची अन् राष्ट्र प्रेमाची भूमिका मांडली. घटनेत सर्वच समाजातील घटकांसाठी ठोस तरतुद करुन ठेवली. या महापुरुषांने अस्पृश्यांनाच नव्हे,तर स्पृश्यांनाही पुनीत केले. संविधानिक लोकशाहीव्दारे आपण गेली ७२ वर्षे अनेक क्षेत्रात दमदार वाटचाल करीत आहोत,शेजारील पाकिस्तान १४ ऑगस्ट १९४७ रोजी वेगळा झाला त्याची आज काय अवस्था आहे हे लक्षात असू द्या. तरीही संविधान विरोधात सातत्याने गरळ ओकली जाते, त्याचे अवमुल्यन करण्याचे प्रयन्त केले जातात, सोयीचं भावनिक राजकारण केलं जातं हा घटनाद्रोह नाही का?सत्ता ही संविधानानुसार चालली नाही तर, त्या देशाची परवड काय होते त्याचे अफगानिस्तान हे त्याचं उत्तम उदाहरण आहे. लोकशाहीत विरोधी पक्षाची देखील भूमिका ही सत्ताधारी पक्षा इतकीच जबाबदारीची व महत्वाची असते हे बाबासाहेबांनीच सांगितले होते, असे दीपध्वज कोसोदे म्हणाले. या प्रसंगी संस्थेच्या अध्यक्षा साक्षी कोसोदे ,उपाध्यक्ष रुपाली हिवरे ,सचिव संतोष कोसोदे , सावन मेढे , दिपाली हिवरे , कमल तायडे , अनिल हिवरे यांचे सह असंख्य समाजबांधव उपस्थित होते



