‘पूल वाहून गेला, आता विकासही हरवला का?’ – गृहमंत्र्यांना जीपीएस पाठवण्याची सातोड ग्रामस्थांची उपरोधिक मागणी

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी
पाच वर्षांपासून पुलाचा प्रश्न रखडला; सातोड ग्रामस्थांचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन
मुक्ताईनगर | प्रतिनिधी
मुक्ताईनगर तालुक्यातील सातोड येथील नागरिकांनी गावातील पाच वर्षांपूर्वी वाहून गेलेल्या पुलाच्या प्रश्नावर तीव्र नाराजी व्यक्त करत राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उपरोधिक स्वरूपाचे निवेदन सादर केले आहे. पुलासह गावाचा विकासही हरवला असल्याची खंत व्यक्त करत “विकास शोधण्यासाठी जीपीएस पाठवा” अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, पाच वर्षांपूर्वी पूरस्थितीत गावातील महत्त्वाचा पूल वाहून गेला. त्यानंतर अनेकदा आश्वासने देण्यात आली, मात्र प्रत्यक्षात नवीन पूल उभारण्याचे काम सुरू झालेले नाही. परिणामी पावसाळ्यात गावकऱ्यांना, विद्यार्थ्यांना, शेतकऱ्यांना तसेच रुग्णवाहिकेसह इतर अत्यावश्यक सेवांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
निवेदनात प्रशासन आणि लोकप्रतिनिधींवर उपरोधिक भाषेत टीका करण्यात आली असून, गावाचा विकास एखाद्या फाईलमध्ये, मंजुरीमध्ये किंवा उद्घाटनाच्या फलकावर हरवला असावा, अशी टिप्पणी करण्यात आली आहे. तसेच केवळ आश्वासनांऐवजी प्रत्यक्ष विकासकामे करण्याची मागणीही ग्रामस्थांनी केली आहे.
ग्रामस्थांनी शासनाकडे पुलाच्या कामाची तातडीने पाहणी करून नवीन पूल उभारण्याचे आदेश द्यावेत, निधी मंजुरीची चौकशी करावी, संबंधित अधिकाऱ्यांकडून गेल्या पाच वर्षांतील कार्यवाहीचा अहवाल मागवावा आणि गावकऱ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे.
सदर निवेदनावर सातोड येथील जागरूक ग्रामस्थ नंदलाल शांताराम पाटील यांची स्वाक्षरी असून, गावाच्या विकासासाठी आता ठोस निर्णय घेण्याची अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.



