विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी तातडीने भरतीची गरज – आमदार डॉ. संजय श्रीराम कुटे यांची अधिवेशनात जोरदार मागणी…!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
प्रतिनिधी:- मुकिंदा गव्हांदे जळगाव जामोद
बुलढाणा:- २४ मार्च २०२६
बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर व जळगाव जामोद तालुक्यातील शिक्षण व्यवस्थेवर शिक्षकांच्या मोठ्या प्रमाणातील रिक्त पदांचा गंभीर परिणाम होत असल्याचे चित्र समोर आले आहे. जिल्हा परिषद शाळांमध्ये सुमारे ४० टक्क्यांपर्यंत शिक्षकांची पदे रिक्त असल्याने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीवर विपरीत परिणाम होत आहे.
ग्रामीण भागातील अनेक शाळांमध्ये शिक्षकांची संख्या अत्यल्प असल्याने एकाच शिक्षकावर अनेक वर्गांची जबाबदारी सोपवली जात आहे. परिणामी, विद्यार्थ्यांना आवश्यक त्या प्रमाणात मार्गदर्शन मिळत नाही. काही ठिकाणी परिस्थिती इतकी गंभीर आहे की, शाळा नियमित सुरू असूनही शिक्षणाची गुणवत्ता घसरत असल्याचे पालकांकडून सांगितले जात आहे.
पालक आणि ग्रामस्थांकडून “आमच्या गावात पुरेसे शिक्षक नाहीत”, “मुलांचे अभ्यासात नुकसान होत आहे” अशा तक्रारी सातत्याने पुढे येत आहेत. काही शाळांमध्ये ५० ते ६० टक्क्यांपर्यंत पदे रिक्त असल्याने शिक्षण व्यवस्थेवर ताण वाढला आहे.
या पार्श्वभूमीवर जळगाव जामोद मतदारसंघाचे आमदार डॉ. संजय श्रीराम कुटे यांनी विधानसभेच्या अधिवेशनात हा मुद्दा ठळकपणे उपस्थित करत शासनाचे लक्ष वेधले. शिक्षकांच्या रिक्त पदांमुळे विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ होत असल्याचे त्यांनी स्पष्टपणे नमूद केले.
त्यांनी सांगितले की, शिक्षकांची कमतरता ही केवळ प्रशासनिक समस्या नसून विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. बुलढाणा जिल्ह्यातील सर्व रिक्त पदांचा तातडीने निर्णय घेऊन विशेष शिक्षक भरती मोहीम राबवावी, अशी जोरदार मागणी त्यांनी केली.
तसेच, जिल्ह्यातील सर्व रिक्त पदांचा आढावा घेऊन योग्य त्या ठिकाणी शिक्षकांची नियुक्ती करण्यात यावी, जेणेकरून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळू शकेल, असेही त्यांनी अधोरेखित केले.
शिक्षण विभागाने या गंभीर परिस्थितीकडे दुर्लक्ष न करता लवकरात लवकर ठोस उपाययोजना करणे आवश्यक आहे. अन्यथा, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान वाढत जाऊन त्याचा परिणाम त्यांच्या भविष्यातील प्रगतीवर होण्याची शक्यता नाकारता येत नाही….



