मुक्ताईनगर तालुक्यात वन्य प्राण्यांचा धुमाकूळ? बिबट्या की तरस

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी
मुक्ताईनगर तालुक्यात वन्य प्राण्यांचा धुमाकूळ? बिबट्या की तरस —नागरिकांमध्ये संभ्रममुक्ताईनगर तालुक्यातील चिखली शिवारात अलीकडे घडलेल्या घटनांमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. एका गायीला अज्ञात वन्य प्राण्याने पूर्णपणे फस्त केल्याची घटना उघडकीस आली असून, त्याच परिसरात दादाराव पडळकर यांच्या तीन मेंढ्यांची देखील शिकार करण्यात आल्याचे घटना समोर आले आहे. या घटनांमुळे नेमका कोणता वन्य प्राणी सक्रिय आहे, याबाबत नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.याचप्रमाणे भानगुरा गुणवंत पिवटी , गोपीचंद विवेके यांच्या शेतातील गोठ्यात घुसून गायीची शिकार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गोठ्यात शिरून हल्ला केल्याने हा प्रकार बिबट्याचा असू शकतो, अशी चर्चा आहे; तर काही नागरिक तरस (वाघ) असल्याची शक्यता व्यक्त करत आहे. मात्र अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही.मुक्ताईनगर तालुक्यातील चिखली, घोडसगाव, हरताळा, मानेगाव, रुईखेडा तसेच भानपुरा या शिवारात वन्य प्राण्यांचा वावर वाढल्याची चर्चा असून शेतकरी व ग्रामस्थांमध्ये भीतीचे सावट पसरले आहे. सायंकाळनंतर शेतात जाण्यास नागरिक कचरू लागले आहेत. पशुधनाचे मोठे नुकसान होत असल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडण्याची भीती व्यक्त होत आहे.पत्रकारांनी माहिती घेण्यासाठी मुक्ताईनगर वन विभागाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संबंधित अधिकाऱ्यांकडून प्रतिसाद मिळाला नसल्याची तक्रार आहे. त्यामुळे अधिकृत माहितीअभावी अफवा आणि संभ्रम वाढत आहेत.वन विभागाने तातडीने घटनास्थळी पंचनामा करून पावलांचे ठसे, हल्ल्याची पद्धत आणि इतर पुरावे तपासून संबंधित वन्य प्राण्याची खात्री करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. आवश्यक असल्यास पिंजरे लावणे, गस्त वाढविणे आणि ग्रामस्थांना सतर्कतेचे मार्गदर्शन करणे गरजेचे आहे.वन्य प्राण्यांचे संवर्धन जितके महत्त्वाचे आहे, तितकेच ग्रामीण भागातील नागरिकांच्या सुरक्षेचेही भान राखणे आवश्यक आहे. अन्यथा भीतीच्या छायेत शेतकऱ्यांना स्वतःचा जीव धोक्यात घालून शेती करावी लागेल का, असा सवाल उपस्थित होत आहे.या पार्श्वभूमीवर मुक्ताईनगर वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष घालून ठोस उपाययोजना कराव्यात, अशी एकमुखी मागणी होत आहे.



