वारी येथील हनुमानजी आहेत लाखो भाविकांचे श्रद्धास्थान! वान प्रकल्प चे नाव बदलुन “वरदान प्रकल्प” ठेवण्याची अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ व हिवरखेड विकास मंच ची मागणी!

हिवरखेड: दि.17 एप्रिल |
समर्थ रामदास स्वामींनी साकारलेले वारी येथील हनुमानजी हे लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असून वारी हनुमान हे लोकप्रिय तीर्थक्षेत्र व पर्यटन स्थळ म्हणून नावारूपास येत आहे.
विश्वसनीय सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार मध्य प्रदेशच्या सीमेपासून जवळच असलेले आणि महाराष्ट्राच्या अकोला अमरावती बुलढाणा या तीन जिल्ह्याच्या सीमेवर असलेले तेल्हारा तालुक्यातील हिवरखेड नजीकचे वारी हनुमान मंदिराची स्थापना समर्थ रामदास स्वामींनी केलेली आहे येथून दोन किलोमीटर अंतरावर भैरवगड हे आदिवासी वस्ती असलेले छोटेसे गाव आहे. परंतु आता या गावाला वारी हनुमान म्हणूनच ओळखले जाते. वारी हनुमान येथून सर्वात जवळचे प्रमुख रेल्वे स्थानक अकोला, अकोट आणि शेगाव आहेत.
समर्थ रामदास स्वामींनी स्थापन केलेल्या शक्तिपीठांपैकी एक वारी येथील हनुमानाचे मंदिर सुप्रसिद्ध आहे. या मंदिरात लोकवर्गणीतून, भाविकांच्या देणगीतून, आणि शासकीय निधीतून विकास कामे सातत्याने सुरू आहेत. भाविकांच्या सुविधेसाठी मोठ-मोठे हॉल आणि भंडारे करण्यासाठी वान नदीच्या काठी निसर्गाच्या सानीध्यात प्रशस्त जागा उपलब्ध आहेत. संपूर्ण वर्षभर येथे भाविकांची रेलचेल असते. येथे हनुमान जयंतीचा मोठा उत्सव दरवर्षी साजरा होत असतो. त्याचप्रमाणे पोळ्याची कर, श्रीराम नवमी, महाशिवरात्री असे अनेक सणांवर येथे भक्तांची गर्दी मावेनाशी होते. येथे श्री हनुमंताची एकाच दगडात कोरलेली महाकाय जागरूक साक्षात मूर्ती असून मूर्तीचे दर्शन घेताच भाविकांना वेगळीच अनुभूती मिळते आणि या मूर्तीच्या दर्शनाने भक्तगण धन्य धन्य होतात. सदर हनुमंतांमध्ये लक्षावधी भाविकांची अत्यंत श्रद्धा आहे.
हनुमंताच्या मंदिरा लगतच श्रीराम मंदिर असून श्रीराम सीता लक्ष्मण हनुमान यांच्या आकर्षक मूर्ति आहेत. सोबतच शिवलिंग मंदिर, समर्थ रामदास स्वामी, दामोदरजी महाराज खाकी, इत्यादी आकर्षक मूर्ती सुद्धा आहेत.
हनुमंताच्या दर्शनाला चढते वेळी वान नदीचा पूल ओलांडताच पुरातन चमत्कारिक गौमुखाचे दर्शन होते. चमत्कारी गौमुख कुंड म्हणून विदर्भात प्रसिद्ध असलेला वारी हनुमान येथील गोमुख ओळखला जातो. या गोमुखातून वर्षानुवर्षांपासून पाण्याचा ओघ सतत सुरूच आहे या कुंडाची खोली कुठून आहे व किती फुटावर आहे हे अद्यापही कोणाला माहिती नाही. वारी येथील वान नदीसह सर्व नद्या आणि झिरे यातील पाणी थंडगार असताना गोमुखातील पाणी मात्र नेहमी कोमट असते हे सर्व न उलगडणारे कोडे असून भाविक भक्त याला निसर्गाचा व हनुमंतांचा चमत्कारच म्हणतात.
“वानप्रकल्प चे नाव वरदान प्रकल्प व्हावे.”
वान नदीवर शासनाने वान धरणाची निर्मिती केलेली असून येथील जलाशयाला हनुमान सागर म्हणतात. वान प्रकल्प हे धरण शेती व पिण्याच्या पाण्यासाठी वरदान ठरत असून एक प्रकारे हे हनुमंताचे वरदानच म्हणावे लागेल या धरणाला “वरदान प्रकल्प” नाव द्यावे अशी मागणी अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ आणि हिवरखेड विकास मंच द्वारे सातत्याने केली जात आहे.
सुप्रसिद्ध पर्यटनस्थळ व तीर्थक्षेत्राच्या विकासाला चालना मिळावी.
येथील पर्यटनाला व तीर्थक्षेत्राला चालना देण्यासाठी वारी येथे पार्किंग ते हनुमान मंदिर, मंदिर ते धरण, आणि धरण ते पार्किंग असा रोपवे ट्रॉली केबल कार सुरू करावी आणि वान धरण येथे पर्यटकांसाठी बोटिंगची व जंगल सफारीची सुविधा सुरू करावी अशी मागणी हिवरखेड विकास मंच आणि अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघद्वारे सातत्याने केली जात आहे.



