सांग्रापूरात गॅसचा तीव्र तुटवडा; मध्यरात्रीपासूनच नागरिकांच्या लांबच लांब रांगा….!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
प्रतिनिधी:- मुकिंदा गव्हांदे जळगाव जामोद
संग्रामपूर:- १ एप्रिल २०२६
संग्रामपूर मधील सतगुरु गॅस एजन्सीसमोर पहाटेपर्यंत प्रतीक्षा; महिलां-वृद्धांचीही मोठी गैरसोय सांग्रापूर तालुक्यात गॅस सिलेंडरच्या तीव्र तुटवड्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. स्थानिक सतगुरु गॅस एजन्सी येथे काल मध्यरात्री १ वाजल्यापासूनच नागरिकांनी रांगा लावण्यास सुरुवात केली. पहाटेपर्यंत या रांगा अधिकच वाढत गेल्या असून शेकडो नागरिक आपल्या नंबरसाठी तासन्तास थांबत असल्याचे चित्र पाहायला मिळाले. गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी अनेकांनी रात्रीच घराबाहेर पडत एजन्सीसमोर तळ ठोकला. काही नागरिकांनी रिकामे सिलेंडर घेऊन जागा पकडली तर काहींनी रस्त्याच्या कडेला बसून आपला क्रमांक राखून ठेवला. महिलांपासून वृद्धांपर्यंत सर्वच वयोगटातील नागरिक या रांगेत उभे असल्याने गैरसोय मोठ्या प्रमाणात जाणवत आहे.
स्थानिकांच्या मते, मागील काही दिवसांपासून गॅसचा पुरवठा अनियमित होत असून मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी असल्याने हा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण पसरले आहे. “रात्रभर थांबूनही गॅस मिळेल याची खात्री नाही,” अशी भावना अनेकांनी व्यक्त केली.दरम्यान, एजन्सीकडून पुरवठा सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले जात असले तरी नागरिकांना तत्काळ दिलासा मिळण्याची गरज आहे. प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन गॅसचा पुरवठा नियमित करावा, अशी मागणी जोर धरत आहे….



