शेगाव नगरीतील आनंद सागर पुन्हा सुरू होणार ? गजानन महाराजांच्या भक्तांच्या आशा पल्लवित

(स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी शेगाव मिलिंद चराटे) संतनगरी शेगाव येथे श्री गजानन महाराज यांच्या दर्शनासाठी आलेल्या भक्तांना आनंद सागर येथे जाण्याची नेहमीच ओढ लागलेली असते. जवळपास २२ वर्षांपूर्वी धार्मिक अध्यात्मिक आणि पर्यटन स्थळ म्हणून विकसित झालेल्या आनंद सागरचा प्रकल्प अचानक बंद झाला. मात्र, काही दिवसांपासून आनंद सागर पुन्हा सुरु होणार असल्याच्या चर्चांना सोशल मीडियावर उधाण आल्याने भक्तांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. परंतु, याबाबत संस्थानाकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नाही.विदर्भाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शेगाव येथे श्री गजानन महाराज यांच्या दर्शनासाठी भाविकांची नेहमीच गर्दी असते. येथे आल्यावर श्रींच्या दर्शनानंतर भक्तगण आनंद सागर येथे जात असे. श्री संत गजानन महाराज संस्थानकडून २००१ मध्ये धार्मिक, अध्यात्मिक आणि पर्यटन स्थळ म्हणून आनंद सागर या पर्यटन आणि धार्मिक केंद्राची दोनशे एकर व उभारणी करण्यात आली होती. मंदिराप्रमाणेच आनंद सागर येथे नेहमीच पर्यटकांची गर्दीदिसून येत असे. यामुळे येथे पर्यटन वाढले होते. मध्यंतरी काही कारणामुळे शेगाव संस्थानाने आनंद सागर प्रकल्प बंद करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र दोन दिवसांपूर्वी सोशल मीडियावर आणि आता माध्यमांमध्ये पुन्हा एकदा याची चर्चा रंगल्याने भाविकांमध्ये कुतूहल निर्माण झाले आहे.पुन्हा एकदा आनंद सागर सुरू होणार की काय? याची माहिती जाणून घेण्यासाठी अनेक जण उत्सुक आहेत. मागील दोन दिवसापासून आनंद सागरबाबत ज्या चर्चांना उधाण आले आहे, याबाबत सध्यातरी संस्थानाच्या वतीने आनंद सागर कधी सुरू होणार किंवा कसे असणार याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नाही.




