सौदाळा शिवारात आगीचे तांडव, संत्र्याच्या झाडासह गहू भस्मसात, तात्काळ मदतीची मागणी….!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
प्रतिनिधी:- मुकिंदा गव्हांदे जळगाव जामोद
तेल्हारा १३ मार्च २०२६
सौंदाळा शिवारात लागलेल्या भीषण आगीत शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असून, स्वराज्य पक्षाचे प्रशांत डिक्कर यांनी आज प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन नुकसानीची पाहणी केली व पीडित शेतकऱ्यांना धीर दिला.
मिळालेल्या माहितीनुसार, सौदांळा येथिल शेतकरी गजानन नारायण गोतमारे यांच्या वारखेड शिवारातील गट.न. ५६ क मधिल शेतात अचानक आग लागली. वाऱ्याचा वेग जास्त असल्याने आगीने रौद्र रूप धारण केले. या आगीत गोतमारे यांच्या हाताशी आलेले २ एकर गव्हाचे पीक पूर्णपणे जळून खाक झाले, तर फळबागेतील ३० संत्रा झाडे देखील भस्मसात झाली. वर्षभर पोटच्या लेकराप्रमाणे जोपासलेली बाग आणि पीक डोळ्यादेखत जळतांना पाहून शेतकरी कुटुंब हवालदिल झाले आहे.
पाहणी दरम्यान प्रशांत डिक्कर यांनी प्रशासनाच्या धीम्या कारभारावर नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले की, “शेतकरी आधीच अस्मानी आणि सुलतानी संकटात सापडला आहे. गोतमारे यांचे झालेले नुकसान हे कधीही भरून न निघणारे आहे. त्यांचे कुटुंब या धक्क्यातून सावरू शकत नाही. अशा परिस्थितीत शासनाने कोणत्याही तांत्रिक बाबीत न अडकता, तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्याला भरीव आर्थिक मदत जाहीर करावी.”
”जर प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले, तर स्वराज्य पक्ष शेतकऱ्यांच्या न्यायासाठी रस्त्यावर उतरेल,” असा इशाराही डिक्कर यांनी यावेळी दिला.
या प्रसंगी परिसरातील ग्रामस्थ ज्ञानेश्वर गोतमारे सह शेतकरी उपस्थित होते. ऐन काढणीच्या वेळी गहू जळाल्याने आणि संत्र्याची बाग उद्ध्वस्त झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे….



