दुबार पेरणीनंतर पुन्हा अस्मानी संकट; येऊलखेड परिसरातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान, तातडीच्या मदतीची मागणी

स्टार भारत न्यूज | भगवान पाखरे,
जिल्हा प्रतिनिधी
येऊलखेड : गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे मास नदी आणि खिराटी नाल्याला पूर आला असून, या पुराचे पाणी येऊलखेड परिसरातील शेतांमध्ये शिरल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अनेक शेतांतील उभी पिके पाण्याखाली गेल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.यंदा पावसाच्या अनियमिततेमुळे अनेक शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली होती. त्यानंतर आता आलेल्या मुसळधार पावसामुळे आणि नदी-नाल्यांना आलेल्या पुरामुळे शेतकऱ्यांवर पुन्हा एकदा अस्मानी संकट कोसळले आहे. त्यामुळे पिकांचे मोठे नुकसान होऊन आर्थिक संकट अधिकच गडद झाले आहे.पूरस्थितीची माहिती मिळताच शेगावचे तहसीलदार यांनी येऊलखेड गावाला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. मात्र पुराचे पाणी मोठ्या प्रमाणावर असल्याने त्यांना शेतबांधापर्यंत पोहोचणे शक्य झाले नाही.नुकसानग्रस्त शेतकरी बाबुराव हनवते यांच्यासह परिसरातील शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाई जाहीर करण्याची मागणी केली आहे. शासनाने विलंब न करता आर्थिक मदत द्यावी, अशी अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.संततधार पावसामुळे निर्माण झालेल्या या पूरस्थितीमुळे येऊलखेड परिसरातील शेतीचे मोठे नुकसान झाले असून, प्रशासनाने तातडीने सर्वेक्षण करून मदतकार्याला गती द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडूनही होत आहे.



