तांत्रिक कारणामुळे रखडलेले पीएम किसान व सीएम किसान योजनेचे पैसे तातडीने जमा करा; अन्यथा आंदोलनाचा इशारा

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
चिखली प्रतिनिधी:- सलमान पठाण
जळगाव जामोद : केंद्र सरकारची पीएम किसान योजना आणि राज्य सरकारची सीएम किसान योजना अंतर्गत मिळणारे अनुदान तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांना तांत्रिक कारणांमुळे मिळत नसल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. यामुळे शेतकऱ्यांना वारंवार कृषी विभागाच्या कार्यालयाच्या चकरा माराव्या लागत असून, संबंधित अधिकाऱ्यांकडून तांत्रिक अडचणींचे कारण देत उडवाउडवीची उत्तरे दिली जात असल्याची तक्रार शेतकऱ्यांनी युवा आंदोलक अक्षय पाटील यांच्याकडे केली.
या पार्श्वभूमीवर २२ जून रोजी अक्षय पाटील यांनी सहकाऱ्यांसह तालुका कृषी अधिकारी कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा केली. तांत्रिक अडचणींमुळे रखडलेल्या शेतकऱ्यांच्या समस्या तातडीने सोडवून त्यांना सहकार्य करावे, अशी मागणी त्यांनी केली.
तसेच, संबंधित शेतकऱ्यांचे पीएम किसान व सीएम किसान योजनेचे पैसे त्वरित जमा न झाल्यास आणि शेतकऱ्यांना विनाकारण त्रास दिल्यास तालुका कृषी अधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही अक्षय पाटील यांनी दिला.
यावेळी अनिलसिंह राजपूत, शिवदास खिरोडकार, अजय गिरी, वैभव जाणे, अमोल बहादरे, सदाशिव जाणे, सोपान पाटील, संतोष गणगे, नवलसिंग पावरा, राजेंद्र राखुंडे, गणेश जाणे, पुरुषोत्तम अढाव यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी बांधव उपस्थित होते.



