एकलारा बानोदा गावातील महिला ग्रामसभेचा ऐतिहासिक निर्णय, गाव दारू मुक्त करणार; संग्रामपूर पोलीस स्टेशन मध्ये निवेदन सादर…..!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
प्रतिनिधी:- मुकिंदा गव्हांदे जळगाव जामोद
संग्रामपूर :- ३० ऑगस्ट २०२६
संग्रामपूर तालुक्यातील एकलारा (बानोदा) गावात अवैध दारू विक्री मोठ्या प्रमाणात वाढली असून, यामुळे गावातील तरुण पिढी व्यसनाच्या आहारी जात आहे. हे अवैध दारूचे धंदे तात्काळ बंद करावेत, या मागणीसाठी ग्रामपंचायत कार्यालय एकलारा (बानोदा) च्या वतीने पोलीस निरीक्षक, पोलीस ठाणे तामगाव व जिल्हा पोलीस अधीक्षक, बुलढाणा यांना निवेदन सादर करण्यात आले आहे. निवेदनात म्हटले आहे की, गावात काही ठिकाणी चोरून अवैध दारू विक्री सुरू आहे. गेल्या दोन-तीन वर्षात दारूच्या अतिसेवनामुळे गावातील काही युवकांचा मृत्यू देखील झाला आहे. दारूमुळे गावातील अनेक कुटुंबे उद्ध्वस्त होत आहेत.
सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, ग्रामपंचायतीने गावातील दवाखाना व अंगणवाडी येथे पिण्याच्या पाण्यासाठी 24 तास नळाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. मात्र, दारू पिणारे लोक त्याच नळावर दारू पिऊन तिथेच दारूच्या बाटल्या टाकून देतात. यामुळे अंगणवाडी व सरकारी दवाखान्यासारख्या पवित्र ठिकाणी घाणीचे वातावरण तयार झाले असून लहान मुले व रुग्णांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
या गंभीर समस्येची दखल घेत गावात नुकतीच महिला ग्रामसभा घेण्यात आली. या सभेत महिलांनी एकमताने दारूबंदीचा ठराव घेतला आहे. या ठरावानुसार गावातील अवैध दारू दुकाने बंद करावीत, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.
या निवेदनावर लोकनियुक्त सरपंच सौ. भारती प्रविण अस्वार व तसेच ग्राम पंचायत सदस्य,यांच्या स्वाक्षऱ्या असून, या निवेदनाची प्रत तामगाव पोलीस स्टेशन येथे दि. 29/08/2024 रोजी स्वीकारण्यात आली आहे. पोलीस प्रशासन यावर काय कारवाई करते याकडे संपूर्ण गावाचे लक्ष लागले आहे




