अकोलामहाराष्ट्रविदर्भशेती

शेतकऱ्यांनी पेरा नाही केला तर काय खातील धतूरा?” — आकाश दादा शिरसाट यांचा सरकारला सवाल

महागाईविरोधात अकोल्यात वंचित बहुजन आघाडीचा एल्गार ; बैलगाडी मोर्चातून सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी


“शेतकऱ्यांनी पेरा नाही केला तर काय खातील धतूरा?” — आकाश दादा शिरसाट यांचा सरकारला सवाल


अकोला प्रतिनिधी :

देशात आणि राज्यात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या महागाईच्या निषेधार्थ अकोला जिल्ह्यात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य बैलगाडी मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या आंदोलनात सम्राट अशोक सेना महाराष्ट्र राज्याचे आकाश दादा शिरसाट यांनी सहभाग घेत केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार तसेच राज्यातील देवेंद्र फडणवीस यांच्या धोरणांचा जाहीर निषेध व्यक्त केला.


अकोला टॉवर चौक येथील वंचित बहुजन आघाडीच्या पक्ष कार्यालयापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत निघालेल्या या मोर्चात तेल्हारा, बाळापूर, पातूर, मूर्तिजापूर, बार्शीटाकळीसह ग्रामीण भागातील शेतकरी, महिला, सामाजिक कार्यकर्ते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. हातात विविध मागण्यांचे फलक घेऊन आंदोलकांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.


महागाईच्या झळा सामान्य नागरिकांसह शेतकरी वर्गालाही तीव्रपणे बसत असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले. पेट्रोल-डिझेलचे वाढते दर, खतांचा काळाबाजार, बोगस बियाण्यांचा सुळसुळाट, शेती मशागतीसाठी डिझेलची टंचाई आणि कर्जमाफीच्या अपूर्ण घोषणा यामुळे शेतकरी चारही बाजूंनी संकटात सापडल्याची भावना आंदोलकांनी व्यक्त केली.


सम्राट अशोक सेनेचे आकाश दादा शिरसाट यांनी आपल्या भाषणात सरकारच्या आर्थिक धोरणांवर सडकून टीका केली. “महागाईमुळे सर्वसामान्यांचे जगणे कठीण झाले आहे. गॅस, पेट्रोल, डिझेल आणि जीवनावश्यक वस्तूंच्या सतत वाढणाऱ्या किमतींमुळे जनता त्रस्त झाली असून सरकारने जनतेच्या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहण्याची वेळ आली आहे,” असे ते म्हणाले.


या आंदोलनाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे बैलगाडी मोर्चाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या वेदना आणि ग्रामीण वास्तव सरकारपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात आला. “शेतकऱ्यांनी पेरा नाही केला तर काय खातील धतूरा?” या घोषणेमुळे आंदोलनाला अधिक धार मिळाली. शहर परिसर काही काळ घोषणांनी दणाणून गेला होता.


मोर्चाच्या शेवटी निवासी जिल्हाधिकाऱ्यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. वाढत्या महागाईवर नियंत्रण आणावे, इंधन दर कमी करावेत, शेतकऱ्यांना तातडीने दिलासा द्यावा आणि जीवनावश्यक वस्तूंच्या किमती आटोक्यात आणाव्यात, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.


संपादकीय विश्लेषण :


अकोल्यातील हा बैलगाडी मोर्चा केवळ राजकीय आंदोलन नव्हता, तर ग्रामीण भारताच्या वेदनेचा आवाज होता. वाढती महागाई, शेतीतील अनिश्चितता आणि रोजगाराचा प्रश्न यामुळे सामान्य जनता अस्वस्थ झाली आहे. बैलगाडी हे प्रतीक निवडून आंदोलकांनी सरकारला एक प्रकारे ग्रामीण अर्थव्यवस्थेची आठवण करून दिली.


आज शेतकरी उत्पादन करतो, पण त्यालाच उत्पादन खर्च भागवणे कठीण झाले आहे. दुसरीकडे इंधन दरवाढीमुळे वाहतूक, शेती आणि बाजार व्यवस्थेवर मोठा परिणाम होत आहे. महागाईच्या विरोधातील अशा आंदोलनांकडे केवळ राजकीय चष्म्यातून न पाहता सरकारने जनभावनांचा गंभीर इशारा म्हणून पाहण्याची गरज आहे.


लोकशाहीत आंदोलन हा जनतेचा अधिकार आहे आणि अशा मोर्चांतून व्यक्त होणारी नाराजी ही व्यवस्थेसाठी धोक्याची घंटा ठरू शकते. सरकारने वेळेत निर्णय घेतला नाही तर ग्रामीण असंतोष आणखी तीव्र होण्याची शक्यता नाकारता येत नाही.


Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button