सोनाळा ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे आमरण उपोषण सुरू; सुजीत बांगर यांची भेट, मागण्यांवर न्याय देण्याची मागणी….!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
प्रतिनिधी:- मुकिंदा गव्हांदे जळगाव जामोद
सोनाळा(ता. संग्रामपूर), दि. 7 मार्च सोनाळा येथील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी ग्रामपंचायत कार्यालयासमोर सुरू असलेल्या आमरण उपोषणाला स्थानिक नागरिकांचा पाठिंबा मिळत आहे. दरम्यान, सामाजिक कार्यकर्ते सुजीत बांगर यांनी आज उपोषण मंडपाला भेट देऊन उपोषणकर्त्यांशी संवाद साधत त्यांच्या मागण्यांबाबत सविस्तर चर्चा केली.
सोनाळा ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी दि. ४ मार्च २०२६ पासून ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. कर्मचाऱ्यांनी प्रशासनाकडे आपल्या मागण्यांवर न्याय मिळवून देण्याची मागणी केली आहे. उपोषणकर्त्यांनी मांडलेल्या समस्या आणि मागण्या रास्त असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.
तसेच, उपोषणकर्त्यांच्या मागणीनुसार २५ ते ३० वर्षांपासून कार्यरत असलेल्या पाणीपुरवठा कर्मचाऱ्यांना रिक्त पदांवर संधी देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. मात्र, या मागणीवर अद्याप कोणतीही दखल घेण्यात आली नसल्याचा आरोप उपोषणकर्त्यांनी केला आहे. तसेच ग्रामपंचायतीतील रिक्त पदे भरण्याच्या प्रक्रियेत पारदर्शकता पाळली जात नसल्याचा संशयही व्यक्त करण्यात आला आहे.
उपोषण मंडपाला भेट देताना सुजीत बांगर यांनी कर्मचाऱ्यांच्या मागण्या ऐकून घेत प्रशासनाने या प्रकरणाची सखोल चौकशी करून न्याय्य निर्णय घ्यावा, अशी मागणी केली. तसेच उपोषणकर्त्यांच्या आंदोलनाला आपला जाहीर पाठिंबा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
प्रशासनाने या मागण्यांकडे तातडीने लक्ष न दिल्यास उपोषणकर्त्यांच्या समर्थनार्थ संविधानिक मार्गाने पुढील आंदोलन उभारण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला. त्यामुळे या आंदोलनाकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
या आमरण उपोषणात राजेश उमाळे, गोविंदा देशमुख, शेख आसिफ, देवासिंग कछवाड, शंकर कांदळकर हे कर्मचारी सहभागी झाले आहेत….



