मुक्ताईनगर नगरपंचायत निकालानंतर ‘झिरो टॉलरन्स’; मिरवणूक काढणाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल होणारजमावबंदी लागू; पोलीस निरीक्षक आशिष आडसूळ यांचा थेट इशारा – कायदा हातात घेतल्यास सुटका नाही

मुक्ताईनगर | प्रतिनिधी
मुक्ताईनगर नगरपंचायत निवडणुकीचा निकाल जाहीर होताच शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस प्रशासनाने अत्यंत कडक आणि निर्णायक भूमिका घेतली आहे. निकालानंतर विजय मिरवणूक, जल्लोष, रॅली, घोषणाबाजी, फटाके, जमाव किंवा सार्वजनिक गर्दीस पूर्णतः बंदी घालण्यात आली असून शहरात जमावबंदी (कलम 144) लागू करण्यात आली आहे.
या संदर्भात मुक्ताईनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री. आशिष आडसूळ यांनी स्पष्टपणे सांगितले की,
“कोणत्याही राजकीय पक्ष, उमेदवार किंवा कार्यकर्त्यांना मिरवणूक काढण्याची परवानगी दिली जाणार नाही. आदेशाचे उल्लंघन केल्यास थेट गुन्हे दाखल करण्यात येतील. कायदा मोडणाऱ्यांवर कोणतीही दया दाखवली जाणार नाही.”
निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर शहरातील संवेदनशील भागांमध्ये अतिरिक्त पोलीस फौजफाटा, कडक नाकाबंदी, सतत गस्त आणि सीसीटीव्हीद्वारे बारकाईने नजर ठेवण्यात येत आहे. सोशल मीडियावरून चिथावणीखोर संदेश, अफवा पसरवणाऱ्यांवरही विशेष लक्ष ठेवण्यात येत असून अशा व्यक्तींवरही कडक कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.
पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, लोकशाहीचा उत्सव शांततेत साजरा झाला पाहिजे, मात्र शांततेचा भंग करण्याचा कुठलाही प्रयत्न खपवून घेतला जाणार नाही. नागरिकांनी कायदा हातात न घेता प्रशासनास सहकार्य करावे, अन्यथा कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल, असा स्पष्ट संदेश देण्यात आला आहे.



