फुले – आंबेडकरी विचारधारा अधिक प्रवाही करणे काळाची गरज : जयसिंग वाघ


चाळीसगाव :- आज देशात महात्मा फुले , डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव मोठ्या प्रमाणात घेतले जात असले, त्यांच्या नावाने विविध कार्यक्रम होत असले तरी या महामानवांची विचारधारा प्रत्यक्षात आणण्यासाठी ठोस कृतिकार्यक्रम होत नसल्याने त्याचे स्वरूप वरपांगी स्वरूपाचे ठरत आहे तेंव्हा फुले – आंबेडकरी विचारधारा अधिक प्रवाही करणे काळाची गरज आहे असे स्पष्ट प्रतिपादन प्रसिद्ध साहित्यिक जयसिंग वाघ यांनी केले.
भारतीय बौद्ध महासभा तर्फे नवजीवन सिंधी सभागृह , चाळीसगाव येथे दिनांक १८ एप्रिल रोजी आयोजित कार्यक्रमात मुख्यवक्ता म्हणून भाषण करतांना वाघ बोलत होते.
जयसिंग वाघ यांनी आपल्या भाषणात पुढं सांगितले की , छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती महात्मा फुले यांनी सर्वप्रथम साजरी केली , त्यांच्या समाधीचा शोध लाऊन त्यांचे कार्य जनते समोर आणले मात्र हल्ली शिवाजी महाराज विकृत स्वरूपात मांडला जात आहे . महात्मा फुले यांनी सरकार पेक्षा अधिक धाडस दाखवून शिक्षण चळवळ चालविली आज शाळा बंद करणे व खोटे – खोटे विचार मुलांना शिकविणे सुरू आहे , बाबासाहेबांचे विचार तोडून – मोडून मांडून खरे बाबासाहेब बाजूला ठेवले जात आहे . ही परिस्थिती देशाला अंधार अवस्थेकडे नेणारी आहे तेंव्हा आपण फुले – आंबेडकरी विचारधारे विषयी अधिक सजग राहावे .
अमरावतीचे आलोक दामोदर यांनी आपल्या भाषणात बाबासाहेब , महात्मा फुले , शिवाजी महाराज , तुकडोजी महाराज यांचे विचार मांडून आज ते कसे कालसुसंगत आहेत असे सांगितले .
कार्यक्रमाच्या सुरवातीस भगवान बुध्द , डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व त्रिसरण, पंचशील ग्रहण करण्यात आले.
माजी आमदार साहेबराव घोडे यांच्या हस्ते दिनकर संसारे , सुनील भालेराव , प्रभाकर पारवे , अलका मोरे , रमेश आव्हाड , तुषार तायडे , राकेश सोनवणे , कुणाल जाधव , निशांत सोनवणे यांचा शाल , बुके , प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मधुकर पगारे होते , सूत्रसंचालन रवींद्र निकम यांनी तर आभारप्रदर्शन अर्जुन भालेराव यांनी केले . मंचावर निमंत्रित मान्यवरांसह एकनाथ सोनवणे , आबासाहेब गरुड , माजी नगरसेवक चंदू तायडे आदी हजर होते . कार्यक्रमास स्त्री – पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.





